बाळाच्या मृतदेहासह पालकांची भरपावसात रात्रीची आठ किमी पायपीठ, ॲम्ब्युलन्स देण्यास रुग्णालयाचा नकार
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच विशेषतः पाणी साचलेल्या भागातून प्रवास टाळण्याचे आणि सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मोखाडा जिल्ह्यातील रुग्णालयात हृदयद्रावक घटना घडली आहे. बाळाच्या मृतदेहाला ॲम्ब्युलन्स देण्यास रुग्णालयाने नकार दिल्याने एका दाम्पत्याला आपल्या चार दिवसाच्या बाळाचा मृतदेह घेऊन रात्री भरपावसात 8 किमीची पायी चालत घर गाठण्याची नौबत आली. या घटनेमुळे ॲम्ब्युलन्स न देणाऱ्या रुग्णालयाच्या कारभारावर टीका होत आहे.
पालघरात एका चार दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घरी नेण्यास त्याच्या आई-वडीलांना मोखाडा जिल्हा रुग्णालयातील स्टाफने ॲम्ब्युलन्स देण्यास नकार दिला. यामुळे पालकांना आपल्या नवजात बाळाचे कलेवर घेऊन रात्रीच्या भरपावसात ८ किमी पायपीट करावी लागली. आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यंत्रणेच्या गैरकारभाराचा या चार दिवसाच्या बाळाच्या पालकांना बसला आहे.
पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका
पालघर जिल्ह्यातील सकवार गावात वरठा पाडा येथील अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरामध्ये अडकून पडलेले दोन कुटुंबातील 13 जणांची तसेच शेजारील कंपनीच्या शेडमधील सहा जणांची अशा एकूण 19 नागरिकांची बचाव पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुटका केली आहे. यामध्ये एकूण 14 पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्व नागरिकांची पेल्हार परिसरातील त्यांचे घर आणि नातेवाईकांच्या घरी राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली.
शेतात शॉक लागल्याने मृत्यू
लातूर जिल्ह्यातल्या ढोरसांगवी येथे विद्युत शॉक लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. शेतात बोअरवेलच्या मोटारीचे कनेक्शन जमिनीवर अंथरण्यात आलेले होते. या इलेक्ट्रीक वायरचा जबरदस्त शॉक बसल्याने शंकर येमुलवाड ( वय 55) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.निष्काळजीने विद्युत प्रवाह हाताळणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.
मुंबईत मिठी नदीचे पाणी वाढले
मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यांना रविवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. मुंबईतील सगळ्यात मोठ्या मिठी नदीला पुर आल्याने ती सध्या दुथडी भरून वाहत आहे. मिठी नदीची धोक्याची पातळी ४ मीटर असून सध्या मिठी नदीची पातळी २.७० मीटर एवढी झाली आहे.त्यामुळे कुर्ला क्रांती नगर आणि आसपासच्या झोपडपट्टीवासीयांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
