Pune : ना स्वच्छ वातावरण, ना एक्सपायरी डेट! चाकणमधल्या महावीर स्वीट मार्टवर अन्न-औषध प्रशासनाचा छापा
मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थ बनविताना स्वच्छता बाळगणे, पॅकबंद पदार्थांच्या बॉक्सवर एक्सपायरी डेट नमूद करणे त्याचप्रमाणे इतर नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मंचर, पुणे : अस्वच्छ वातावरणात मिठाई तयार करून विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई (Action) करण्यात आली आहे. मंचर आणि चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासन (Food and Drug Administration) कार्यालयाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. मंचर येथील महावीर डेअरी अॅन्ड स्वीट मार्टमध्ये अस्वच्छ परिस्थितीत खवा आणि गुजरात बर्फी साठविल्याने ही कारवाई करण्यात आली. चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रे वर ‘बेस्ट बिफोर’ दिनांकदेखील नमूद केली नसल्याचे समोर आले आहे. येथील महावीर स्वीट मार्टवर (Sweet mart) धाड टाकली असता अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला खवा आणि स्वीट आढळून आले. 23 हजार 800 रुपये किंमतीचा 119 किलो खवा आणि 5 हजार 600 रुपये किंमतीचा 28 किलो स्वीट खवा (गुजरात बर्फी) असा एकूण 29 हजार 400 किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
विक्रेत्यांकडून गैरफायदा
स्वीट खवा आणि गुजरात बर्फी ही साखर, दूध पावडर, खाद्यतेल आदी घटक पदार्थांपासून बनविण्यात आल्याचे लेबलवरून स्पष्ट होत आहे. अनेक परराज्यांतील विक्रेत्यांनी शहरभर तसेच जिल्ह्यांत विविध ठिकाणी दुकाने थाटली आहेत. अव्वा च्या सव्वा किंमत लावून मिठाई विकली जाते. सध्या सण-उत्सव सुरू असल्यामुळे मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा गैरफायदा या विक्रेत्यांकडून घेतला जात आहे.
रोगराईमुळे नागरिक हैराण
गणेशोत्सव सध्या सुरू आहे. सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती गणपतीसाठी मिठाईची मोठी मागणी असते. तयार मोदक तसेच इतर गोड पदार्थांनाही मागणी आहे. आधीच रोगराईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात मिठाईच्या दुकानांत स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आले आहे. अस्वच्छ वातावरणात हे खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय त्यावर एक्सपायरी डेटदेखील नमूद करण्यात आलेली नसते. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
अन्न-औषध प्रशासन पथक
ही कारवाई अन्न-औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या उपस्थितीत सु. स. क्षीरसागर, सहायक आयुक्त नि. बा. खोसे आदींसह कर्मचाऱ्यांनी केली आहे.
अन्न-औषध प्रशासनाकडून इशारा
मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थ बनविताना स्वच्छता बाळगणे, पॅकबंद पदार्थांच्या बॉक्सवर एक्सपायरी डेट नमूद करणे त्याचप्रमाणे इतर नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.