
सुनिल थिगळे, शिरूर, पुणे | 28 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे. परंतु हे बिबटे मानवी वस्तीत येत असल्यामुळे अधिकच धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यात पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहे. जंगलामध्ये भक्ष्य मिळत नसल्यामुळे बिबट्यांनी मानवी वस्तीची वाट धरली आहे. यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. शेतकरी आणि शेतमजूर यांना बिबट्यांच्या दहशतीतच शेतात जावे लागत आहेत.
शिरूर तालुक्यातील जांबूत- पिंपरखेड रस्त्यावर रात्रीच्या वेळी चार बिबटे निदर्शनास आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने मेंढपाळ, शेतमजूर, नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
एकाच वेळी चार बिबटे, पुणे जिल्ह्यात भीतीचे वातावरण pic.twitter.com/zFI5wt2qv8
— jitendra (@jitendrazavar) August 28, 2023
मागील वर्षी जांबुत, पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी बिबट्याने अनेक जणांवर हल्ले चढवले होते. पशुधनही मोठ्या प्रमाणात धोक्यात आले होते. या चार बिबट्यांच्या दर्शनामुळे त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
मनमाड तालुक्यात शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. मनमाडच्या माळेगावजवळ घडलेल्या या घटनेत बंडू घुटे जखमी झाले आहे. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.
अहमदनगरला पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील सुतकडा परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. यापूर्वीही या परिसरातून चार बिबट्यांना जेरबंद केले होते. या बिबट्याने पशुधनावर हल्ला करून शेळी आणि कुत्रे फस्त केली होती. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला होतो. त्यात तो अडकला. त्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर माळशेज घाटात सोडून देण्यात येणार आहे.