पुणे पोलीस दलात मोठा भूकंप, एका रात्रीत अनेकांच्या बदल्या, नेमकं काय घडलं?

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करून पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. अकार्यक्षमता आणि स्थानिक हितसंबंधांमुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलीस दलात मोठा भूकंप, एका रात्रीत अनेकांच्या बदल्या, नेमकं काय घडलं?
pune police
| Updated on: Feb 20, 2026 | 11:33 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी चोरी, लूट, हत्या, अपहरण, अत्याचाराच्या घटनांना पेव फुटले आहे. त्यातच आता पुणे शहर पोलीस दलात गुरुवारी मोठी खळबळ उडाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ पोलीस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. एकाच पोलीस ठाण्यातून इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केल्याने संपूर्ण पोलीस दलात मोठा दणका बसला आहे.

नेमकी कारवाई काय?

पुणे पोलीस आयुक्तांनी प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारत ३२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या कारवाईमध्ये प्रामुख्याने ३ सहाय्यक पोलीस फौजदार (ASI), १० पोलीस हवालदार (HC) आणि १९ पोलीस अंमलदारांचा (PC) समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने पुणे विमानतळ आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांत रवानगी करण्यात आली आहे. या बदल्यांचे कारण अधिकृत आदेशात प्रशासकीय असे नमूद करण्यात आले आहे. तरी पोलीस दलातील अंतर्गत वर्तुळात ही केवळ नियमित बदली नसून एक प्रकारची शिक्षात्मक कारवाई असल्याची चर्चा रंगली आहे. या ३२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमागे काही अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची कारणे समोर आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महत्त्वाची कारणं काय?

१. अनेक कर्मचारी आपला ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही विविध वशिल्यांचा वापर करून लोणी काळभोरमध्येच ठाण मांडून बसले होते.
२. काही कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहत होते. यामुळे त्यांचे स्थानिक गुन्हेगार आणि वाळू उपसा करणाऱ्या टोळ्यांशी जवळचे संबंध निर्माण झाल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे पोहोचल्या होत्या.
३. लोणी काळभोर परिसरात वाढती गुन्हेगारी, कोयता गँगचा धुमाकूळ आणि बेकायदेशीर धंद्यांवर वचक ठेवण्यात हे कर्मचारी अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
४. पोलीस आयुक्तांनी गुप्तचर विभागाकडून घेतलेल्या गोपनीय अहवालात या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

पोलीस दलात मोठी चर्चा

अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून झिरो टॉलरन्स (Zero Tolerance) धोरण अवलंबले आहे. लोणी काळभोरमधील या मास ट्रान्सफरमुळे शहरातील इतर पोलीस ठाण्यांतील आरामदायी खुर्ची उबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. एकाच वेळी ३२ लोकांची बदली होणे म्हणजे पोलीस ठाणे अर्धे साफ झाल्यासारखेच आहे.