पवारसाहेब आमचा आमदार बदला, त्याशिवाय…; दत्ता भरणेंच्या इंदापुरात स्थानिकांची शरद पवारांकडे मागणी

Sharad Pawar Indapur Dushakali Daura : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. सध्या ते इंदापूर तालुक्यात आहेत. यावेळी स्थानिकांनी एक वेगळीच मागणी पवारांपुढे ठेवली. त्यांनी आमदार बदलण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर...

पवारसाहेब आमचा आमदार बदला, त्याशिवाय...; दत्ता भरणेंच्या इंदापुरात स्थानिकांची शरद पवारांकडे मागणी
शरद पवार
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Jun 12, 2024 | 8:32 PM

शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. निवडणुकीच्यानंतर पवार सध्या विविध भागांना भेटी देत आहेत. स्थानिक पातळीवरची परिस्थिती काय आहे? याचा आढावा घेत आहेत. बारामती, पुरंदर नंतर शरद पवार हे इंदापूर तालुक्यात आहेत. इंदापूरमधील निरवांगी या गावात शरद पवार सध्या आहेत. यावेळी स्थानिकांनी शरद पवार यांच्यापुढे एक मागणी केली. शरद पवारसाहेब आमचा आमदार बदला…. आप्पासाहेब जगदाळे यांना आमदार करा. कारण इंदापूरचा आमदार बदलल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत, असं मागणं स्थानिकांनी शरद पवारांसमोर ठेवलं.

स्थानिकांनी प्रश्न मांडले…

22 गावांचा बारमाही पाण्याचा प्रश्न सोडवावा. नीरा नदीवर बंधारा करावा. जनावरांसाठी चारा छावणी द्यावी. दुधाचे अनुदान थकलं आहे, ते मिळावं. आम्ही दूध आणि डाळिंब यावरच अवलंबून आहोत. दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जानेवारीमध्ये घोषित केलंय. पण ते मिळालेलं नाही, असं म्हणत स्थानिकांनी पवारांसमोर आपल्या समस्या मांडल्या.

शरद पवारांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर पवारांनी त्यांच्याशी संवाद साधला. सरकारला अनुदान द्यावेच लागेल. नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे.नाहीतर 4-6 महिने थांबा. कारण मला सरकार बदलायचे आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार, असं शरद पवार म्हणाले.

निवडणुकीवर काय म्हणाले?

शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. ते सध्या इंदापूर तालुक्यात दौरा करत आहेत. दुष्काळाची पाहणी ते करत आहेत. यावेळी शरद पवार स्थानिकांशी संवाद साधत आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठी पवारांकडून दुबार पेरणी सुरू आहे. चार महिन्यांनी सरकार बदलायचं आहे. त्यासाठी तुमची साथ हवीय, असं म्हणत शरद पवार यांनी इंदापूरकरांना साद घातली.

गेले काही दिवस राज्यात काही भागात दुष्काळ आहे. प्रत्यक्ष काय स्थिती आहे पहावं म्हणून आलोय. आता पाऊस सुरू झालाय. पाऊस किती दिवस टिकेल, दुष्काळ घालवेल का? हा प्रश्न आहे. नीरा डावा कालवा खराब आहे. जे काही ठरलेले पाणी येत नाही. वरचे लोक पाणी इकडे येऊ देतं नाहीत. राज्य सरकारला सांगून काम करावी लागतील. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता सरकार किती काम करेल माहिती नाही. पण आम्ही निर्णय घेतला आहेस काहीही झालं तर सरकार आपल्या हातात घेण्याच ठरवलेलं आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याला अशी अपेक्षा आहे, असंही शरद पवार म्हणाले.