तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?, शरद पवार यांचा मोठा सवाल; रोख कुणाच्या दिशेने?

| Updated on: Feb 22, 2023 | 1:47 PM

सत्तेचा गैरवापर करून एखाद्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह हिरावलं जातं हे कधी या देशात घडलं नव्हतं. काँग्रेसमध्ये अनेक फुटी झाल्यात. पण संपूर्ण पक्षच काढून घेतला आणि कुणाला तरी दिला असं कधी घडलं नव्हतं.

तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?, शरद पवार यांचा मोठा सवाल; रोख कुणाच्या दिशेने?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिशेने संशयाची सुई नेल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. त्यातच शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक मौन बाळगल्याने हा संशय अधिकच वाढला. मात्र, आता शरद पवार यांनी या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं आहे. पहाटेचा शपथ विधी झाला नसता, राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या सवालाचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने असल्याचं सांगितलं जात आहे.

शरद पवार पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही उपस्थित होते. त्यावेळी सरकार बदलण्याचा प्रयत्न झाला. त्याचा एक फायदा झाला. राष्ट्रपती राजवट उठली. ती उठल्यानंतर नेमकं काय आलं हे तुम्ही पाहिलं असेल, असा चिमटा काढतानाच आता त्या शपथविधीवर बोलायची गरजच काय? असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?, असा सवालच शरद पवार यांनी केला.

आयोगावर कोण आहे काय?

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्तेचा गैरवापर करून एखाद्या राजकीय पक्षाचं नाव आणि चिन्ह हिरावलं जातं हे कधी या देशात घडलं नव्हतं. काँग्रेसमध्ये अनेक फुटी झाल्यात. पण संपूर्ण पक्षच काढून घेतला आणि कुणाला तरी दिला असं कधी घडलं नव्हतं. यामागे कोणती तरी शक्ती असण्याची शक्यता असण्याचं नाकारण्यात येत नाही. निर्णय कोण घेतं? आयोग निर्णय घेतं की आयोगावर कोण आहे. ज्यांनी हे केलंय त्यांना लोक धडा शिकवतील, असंही ते म्हणाले.

ते भाजपचं वैशिष्ट्ये

यावेळी त्यांनी निवडणुकांवरही भाष्य केलं. मी 14 निवडणुका लढलो. सुदैवाने एकदाही लोकांनी मला घरी पाठवलं नाही. एक किंवा दोन निवडणुका सोडल्या तर मला एखाद दुसऱ्या सभेशिवाय कधी मतदारसंघात जावं लागलं नाही. कामाची पद्धत असते. यंत्रणा असते. लोकांशी संबंध असतो. त्यामुळे लोक निवडून देतात. पण भाजप नेत्यांची गर्दी करत असते. हे त्यांचं वैशिष्ट्ये आहे, असा टोला त्यांनी लगावला.