Pushpak Express accident : …म्हणून 11 जणांचा गेला बळी, जळगावच्या भीषण रेल्वे अपघाताचं तांत्रिक कारण समोर
जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे, या अपघातामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचं तांत्रिक कारण आता समोर आलं आहे.

जळगाव जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा भीषण अपघात झाला आहे. पुष्पक ट्रेनला आग लागल्याची अफवा उठली, या अफवेमुळे ट्रेन थांबली असताना देखील 30 ते 35 प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उडी मारली. मात्र समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने या प्रवाशांना चिरडलं. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण जखमी आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकाड वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हा अपघात प्रवाशांमध्ये निर्माण झालेल्या आगीच्या भीतीमुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र अपघाताचं तांत्रिक कारण देखील आता समोर आलं आहे. जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले उन्मेष पाटील
पुष्पक एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईला येत असताना तिला कॉशन ऑर्डर म्हणजे काम सुरू असल्याने स्टॉप घेतला होता. पण कॉशन ऑर्डर घेतली असताना स्टेशनला गाडी थांबवली तर सूचना देऊन प्रवाशांना कळतं गाडी थांबली. काम सुरू आहे. पण ही गाडी स्टेशनजवळ न थांबवता जंगलात थांबवली. त्यामुळे काही प्रवाशी खाली उतरले. एका बाजूला ब्लॉक होता. दुर्देवाने दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस येत होती.
तिने हॉर्न दिला नाही. तिला कॉशन ऑर्डरची माहिती नसावी. कुठे तरी कम्युनिकेशन गॅप दिसतो. हॉर्न किंवा सिग्नल नसल्याने प्रवाशी रेल्वे पटरीजवळ बसले होते. दहा ते 12 प्रवासी होते. त्यांना ऑन द स्पॉट उडवलं. आमचा कार्यकर्ता तिथे आहे. 12 जखमी प्रवाशांना पाचोऱ्याला शिफ्ट करण्यात आलं आहे. कॉशन ऑर्डर ही स्टेशनला घेतली असती तर अपघात झाला नसता. कम्युनिकेशन गॅपही दिसून येत आहे, असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.
11 जणांचा मृत्यू
दरम्यान या अपघातामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. दहा जण जखमी असून, त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.