Sanjay Raut : मी राहुल गांधी समर्थक, ते या देशाचा नेता आहे हे सांगणारा पहिला माणूस मी, ‘छात्रो की गुंज’ आधी संजय राऊत यांचं वक्तव्य

"पुण्यातल्या भाजपच्या लोकांना जर वाटत असेल ते फार मोठी मर्दुमकी गाजवतायत, पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी करु इच्छितात, ही त्यांना लागलेली अखरेची घरघर आहे. भविष्यात ही गुंडगिरी मोडून काढू" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : मी राहुल गांधी समर्थक, ते या देशाचा नेता आहे हे सांगणारा पहिला माणूस मी, छात्रो की गुंज आधी संजय राऊत यांचं वक्तव्य
Sanjay Raut
| Updated on: Aug 22, 2026 | 11:12 AM

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज पुण्यात येत आहेत. ते ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपंवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी या देशाचे नेते आहेत. जर ते एबीवीपीला मान्य नसेल, मोदी-शाह मानतं नसले, तरी भविष्यामध्ये संसदेत राहुल गांधींसमोर या नेत्यांना विरोधी पक्षात बसावं लागणार आहे, याची त्यांनी मानसिक तयारी करुन ठेवावी” असं संजय राऊत म्हणाले. “राहुल गांधींचा कार्यक्रम पाहत होतो पुण्यात. पुणे पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत. विरोधी पक्ष नेते आहेत ते, राहुल गांधी परदेशातून आलेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाहीयत का? पुण्यात अमित शाह येतात अन्य नेते येतात. त्याच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आम्ही आलो की खासकररुन राहुल गांधी आले की अटी टाकायच्या” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“याच कारण एकच आहे. भाजपची यंत्रणा, त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या भाजपच्या पडझडीला सुरुवात होईल, घाबरलेलं सरकार आहे. मोदी-शाहंचे चेहरे बघा तुम्हाला काळे ठिक्क पडलेले चेहरे आहेत. राहुल गांधींना ते घाबरलेत. काल राहुल गांधींनी संसद मार्ग पोलिस स्टेशनला जाऊन ठिय्या मांडला. पॅलेट गन चालवणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करायला लावला. सरकार झुकलं” असं संजय राऊत म्हणाले.

वंदे मातरम आणि भाजपचा संबंध आला कधी?

“वंदे मातरम म्हणजे युवा की आवाज. बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या या युवा की आवाज नाहीत का?. वंदे मातरम आणि भाजपचा संबंध आला कधी?.वंदे मातरम आणि काँग्रेसचा संबंध आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही, त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करु नये. वंदे मातरम 1932 साली घटना समितीने स्वीकारलं. त्या काँग्रेस कमिटीवर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांनी वंदे मातरमची दोन कडवी अधिकृतपणे स्वीकारली. ती भाजपला का मान्य नसावी, त्यांनी ती स्वीकारली पाहिजेत.ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही, ज्यांनी कधी वंदे मातरमची गर्जनी केली नाही. नसती उठाठेव कशाला करताय, वंदे मातरमला कोणी विरोध केलेला नाही” असं संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधी या देशाचा नेता आहे, हे सांगणारा मी पहिला माणूस

रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावलेत, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “राहुल गांधी जेव्हापासून राजकारणात आले, तेव्हापासून मी त्यांचा समर्थक आहे. राहुल गांधी या देशाचा नेता आहे, हे सांगणारा मी पहिला माणूस आहे. तेव्हा लोक मला वेड्यात काढत होते, राहुल गांधींना पप्पू म्हणत होते. तेव्हा हा देशाचा नेता आहे, देशाचं नेतृत्व करेल मी सांगत होतो”

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us