पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय, सगळ्या बाजूने ओरबाडलं जातंय-राज ठाकरे
MNS Leader Raj Thackeray on Land Issue Raigad Marathi People : राज ठाकरे आज अलिबागमध्ये आहेत. इथे बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. स्थानिकांच्या जमीनींच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तसंच महाराष्ट्राला ओरबाडलं जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
![पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय, सगळ्या बाजूने ओरबाडलं जातंय-राज ठाकरे पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय, सगळ्या बाजूने ओरबाडलं जातंय-राज ठाकरे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/01/Alibaug-MNS-Leader-Raj-Thackeray-on-Land-Issue-Raigad-Marathi-People-Latest-Marathi-News.jpeg?w=1280)
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, अलिबाग- रायगड | 15 जानेवारी 2024 : मनसे अध्यक्ष आज अलिबागमध्ये आहेत. अलिबागमध्ये राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्रामध्ये जे-जे उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. हा प्रयत्न सर्व बाजूने होतोय. थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं गांभीर्य स्थानिक लोकांना असलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. आपण किती भोळसाठ आहोत त्याचा नमुना आज या शिबिरात दिसून येत आहेय. ही शिबीर कसली लावली आहे. मला पत्रकारांशी संवाद साधायचा होता. पण तुम्ही याला जामीन परिषद म्हणून याला नाव दिलं, असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली.
बाकी राज्यात त्यांचे त्यांचे नेते त्यांच्या माणसाचे विचार करत असतात. पण आपल्या इथे असे नाही. मला कळले की इथे काही गाव आहेत ती संपली. मला कल्पना आहे ह्या गोष्टीची की सर्वांना पैशांची गरज आहे. तुमची जमीन आहे ती तुम्हाला विकायची नाही विकायचं तुमचा प्रश्न आहे. पण त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळतो का?, असं राज ठाकरे म्हणाले.
जमीन विकताना मधला दलाल मराठी आहे, असं समजून आपण जमीन विकतो. जगाचा कोणताही इतिहास पहिला तर भूगोलावरच आहे. आज नाव्हा शिवा झाला. तेव्हा जमीन गेली. आज जर बाहेर कोणता व्यवसाय करायचा असला तर तुम्हाला तेथील लोकांना पार्टनर घ्यावे लागतं. मग इथे का नाही?, असंही राज ठाकरे म्हणालेत.
सहज तुम्ही जाऊन बघा की जमिनीचे रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर होत आहे. माथेरान,कर्जत आणि नेरळ मधील जमिनी कोण घेत आहेत. या राज्यात फक्त मराठा लोकानी राज्य केलं आणि आत्ता तुमचेच जमीन दुसरे येऊन घेत आहेत. हे काय फक्त रायगड मधे होत नाही तर ठाणे आणि इतर जिल्ह्यात सुद्धा होत आहे. स्थानिक माणूस उध्वस्थ होत आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.