Pushpak Express accident: अपघात प्रकरणी रेल्वेकडून अन् राज्य शासनाकडून मदत जाहीर
जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजिकची रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 15 ते 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून अपघात प्रकरणी तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडूनही मदत जाहीर करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजिकची रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत अनेकजण जखमी झाले असून 11 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान रेल्वेतर्फे मृतांच्या कुटुंबियांना, तसेच जखमींसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे.
लागल्याची अफवा उठली अन् अनेकांनी आपला जीव गमावला
पुष्पक रेल्वेनं अचानक ब्रेक दिल्यानं चाकांमधून ठिणग्या उडाल्या आणि आग लागल्याची अफवा उठली, या अफवेमुळे कोणतरी रेल्वेची चेन ओढली त्यामुळे ट्रेन थांबली अन् 30 ते 35 प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उडी मारली. मात्र त्याचवेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने या प्रवाशांना चिरडलं. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 15 ते 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकाड वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हा अपघात प्रवाशांमध्ये निर्माण झालेल्या आगीच्या भीतीमुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
रेल्वेतर्फे अपघात प्रकरणी तातडीची मदत जाहीर
रेल्वेतर्फे अपघात प्रकरणी तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. यात मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाखांची मदत जाहिर करण्यात आली आहे, गंभीर जखमींसाठी 50 हजार, तर कायम अपगंत्व आलेल्या व्यक्तींसाठी 2 लाख 50 हजार रुपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे. दरम्यान अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरु
अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहचले असून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डाव्होस येथून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदतकार्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत.
मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत
जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयातून बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहचली आहे. मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अपघातग्रस्त पुष्पक एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे. रेल्वेचे तांत्रिक अधिकारी व कर्मचारी विभागाकडून बोगीची तपासणी करण्यात आली. तर, अपघातातील काही जखमी मनमाड रेल्वे स्थानकावर उतरले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून आधीच वैद्यकीय टीम तयार ठेवण्यात आली होती. तिथेही जखमींवर उपचार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.