विरोधक निवडणुकांवर बहिष्कार टाकणार? राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं?; संजय राऊत यांनी दिली मोठी अपडेट

संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत बहिष्कार टाकण्याच्या राज ठाकरेंच्या मताला राऊत यांनी सहमती दर्शवली आहे. उद्धव ठाकरेही या भूमिकेशी सहमत असल्याचे राऊतांनी सांगितले. यामुळे आगामी काळात विरोधक एकत्र येऊन निवडणुकांवर बहिष्कार टाकणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

विरोधक निवडणुकांवर बहिष्कार टाकणार? राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं?; संजय राऊत यांनी दिली मोठी अपडेट
संजय राऊत - राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं ?
| Updated on: Jun 06, 2026 | 12:27 PM

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. 17 जागांपैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडलेच. पण विरोधी पक्षाच्या उमेदवारांनाही अर्ज घेण्यास भाग पाडले आहे. या निवडणुकीत मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार बोलून दाखवला आहे. राऊत यांनी राज ठाकरे यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे विरोधक आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे पत्रकारांनी राऊत यांना या भेटीतील चर्चेचा तपशील विचारला. त्यावेळी राऊत यांनी हे भाष्य केलं. मी राज ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या. या सर्व अराजकीय गप्पा होत्या. राज ठाकरे यांच्याकडे साहित्य, संस्कृती आणि पर्यटन याची माहिती असते. त्यांच्याशी आपण या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो. मीही काल त्यांच्याशी या विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंना भूमिका मान्य

त्यानंतर राऊत यांनी या भेटीतील चर्चेचा आणखी एक मुद्दा मीडियासमोर उघड केला. आमची एका विषयावर चर्चा झाली. बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाका, असं राज ठाकरे यांनी या भेटीत सांगितलं. आपण हा मुद्दा वारंवार मांडत असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांचं हे मत मला पटलं आहे. मी उद्धव ठाकरेंना भेटू राज ठाकरेंची भूमिका सांगितली आहे. उद्धव ठाकरेंनाही ही भूमिका मान्य आहे. त्यांनाही वाटतं त्यावर चर्चा झाली पाहिजे. निर्णय झाला पाहिजे. आमदार, खासदार फोडले जात आहेत. त्यामुळे जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं आम्हाला वाटतं. हा विचार देशभर पोहोचेल, अशी आशा आहे, असं राऊत म्हणाले. राऊत यांच्या या विधानानंतर आता विरोधक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुनगंटीवारांना सवाल

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुका बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीतून कुणाला फायदा होतो? कशाला हव्यात या निवडणुका? असा सवाल करतानाच त्यांनी याबाबत केंद्राला पत्र लिहिणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. तुमच्याच पक्षाने घोडेबाजार केला आहे. त्यामुळेच तुम्हाला हे बोलण्याची वेळ आली आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Follow Us