नाशिक, परतवाड्यानंतर आता राळेगाव; तब्बल 34 मुलींसोबत… नेमकं काय घडलं?
राळेगावमध्ये ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने मानवी तस्करीचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान आणि आमदार अशोक उईके यांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सध्या राज्यात महिला अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातून तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचा ही एक अत्यंत गंभीर आणि थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. राळेगाव जवळपास ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून त्यांना परराज्यात देहव्यापारासाठी विकले जात असल्याचा खळबळजनक संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपकडून आक्रमक इशारा
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमदार अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान यांनी तातडीने पोलीस प्रशासनाची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजप सातत्याने या प्रकरणावर लक्ष ठेवून होती. राळेगाव शहरात अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यात विकणे आणि मानवी तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. याबद्दल प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे,” असे मत प्रफुल्लसिंह चौहान यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी बन्सल आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप देखील पोलिसांकडे सुपूर्द केली आहे.
दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
या प्रकरणाची तीव्रता पाहता मंत्र्यांनी स्वतः राळेगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रकरणाचा आढावा घेतला. या तपासात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा सल्ला अशोक उईके यांनी दिला. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पीडित मुलींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महिला अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरले
दरम्यान सध्या राज्यात परतवाडा आणि नाशिक येथील आयटी कंपनीत महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राळेगावमधील हा प्रकार अधिकच संवेदनशील मानला जात आहे. या टोळ्यांचे जाळे राज्यभर पसरले आहे का? याचाही सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरत आहे. राज्यात घडत असलेल्या घटनेनंतर आता महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन याकडे कशाप्रकारे कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
