
“पत्रकार परिषद झाल्यानंतर तपास यंत्रणा काम करत आहेत. त्यांच्यावर आक्षेप नाही. पण त्यांच्या स्पीडवर मात्र आक्षेप आहे. पण प्रेस कॉन्फरन्स झाल्यामुळे तपासाला गती आली आहे. दिल्लीची पीसी झाल्यानंतर डीजीसीएची माणसं खासगी विमानाने बारामतीला गेली होती. आता नेते सुद्धा पत्रकं द्यायला लागलेत ही चांगली गोष्ट आहे. लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्याला लवकरात लवकर उत्तर मिळतील अशी अपेक्षा आहे” असं रोहित पवार म्हणाले. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार आज तिसऱ्यांदा प्रेझेंटेशन देऊन पत्रकार परिषद घेत आहेत.
“अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम त्यात राहतो. घातपाताच्या दिशने जाण्याचा प्रवास सुरु झालाय. 27 तारखेला कोणं भेटायला आलेलं. फोन कोणाचा आलेला हे मुद्दे होते. संध्याकाळी 6.50 ते 7.05 मिनिटापर्यंत फोनवर बोलणं झालं, एवढीच अपडेट देतो” असं रोहित पवार म्हणाले. “व्हीएसआर कंपनीच्या बाबतीत, मेन्टेन्सच्या बाबतीत दाखले दिले होते. बरेच तज्ञ त्या विषयात बोलताना दिसतात. आता जो व्हिडिओ आला त्यात पाहिलं की अधिकचे स्फोट झाले. ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, व्हॉइस रेकॉर्डर नाही अशी कारणं पुढे येऊ शकतात. कालच त्या बाबत सरकारच्या एजन्सीकडून स्पष्टीकरण आलं आहे”
तो रनवे डांबरी होता
“विमानात फ्यूल टँक अधिकचे होते. टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतो. तिथेच मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो. ब्लॅक बॉक्समध्ये कधी अडचण असू शकते. 2023 ला जे विमान पडलेलं ते मोठं होतं. ते रनवे वर पडलेलं. तो डांबरी रनवे होता, कडक होता, दादांच जे विमान कोसळलं ते साईडला पडलं. म्हणजे बॉल तुम्ही फरशीवर टाकला तर बाऊन्स जास्त होतो, मातीत तोच वेग कमी असतो. म्हणजे स्फोट कमी होणं अपेक्षित होतं” या महत्वाच्या मुद्याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं. मागच्या महिन्यात 28 जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं.