लाडकी बहीण योजना बंद करणार? रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ; काय आहे ट्विट?
पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा ९ वरून थेट ४ केल्याने कोट्यवधी लाभार्थी संतप्त झाले आहेत. या निर्णयामुळे अनुदानापासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांनी सरकारवर टीका करत याला "विश्वासघातकी सरकार" म्हटले आहे. मतांसाठी जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून, लाडकी बहीण योजनेबाबतही असाच प्रकार घडत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आल्याने कोट्यवधी लाभार्थ्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा 9 वरून आता डायरेक्ट 4 करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यवधी लाभार्थी हे नाराज झाले आहेत. पूर्वी 9 सिलेंडरवर सबसिडी देण्यात येत होती, मात्र आता ती संख्या फक्त 4 असेल. याच मुद्यावरून आता विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात X ( पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट केली आहे. सरकारने उद्या उज्ज्वला योजनाच सरकारने गुंडाळली तर आश्चर्य वाटणार नाही, असाच प्रकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबीतही घडू शकतो, असा इशाराच एकप्रकारे रोहित पवार यांनी दिलं आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ माजली आहे.
रोहित पवार यांचं ट्विट काय ?
ट्विटरवर रोहित पवार यांनी केलेली पोस्ट काय ते जाणून घेऊया..
” उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या १२ वरुन आधी ९ केली आणि आता ९ वरुन थेट ४ करण्यात आली. उद्या ही उज्ज्वला योजनाच सरकारने गुंडाळली तर आश्चर्य वाटणार नाही. असाच प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीतही सुरु आहे. निवडणुकीत मतांची बेगमी होताच सरसकट लाभ दिल्यानंतर आता वेगवेगळे निकष लावून ८० लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात आलं. उद्या आणखी निकष लावून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाईल किंवा ही योजनाही अशीच बंद केली जाईल.” असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
” पुढील निवडणुकीत पुन्हा अशाच कुठल्यातरी योजनेचं तात्पुरतं गाजर दाखवलं जाईल. कारण मतांसाठी फसवणूक करणारं हे विश्वासघातकी सरकार आहे” असं टीकास्त्रही रोहित पवार यांनी सरकारवर सोडत निशाणा साधला .
उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या १२ वरुन आधी ९ केली आणि आता ९ वरुन थेट ४ करण्यात आली. उद्या ही उज्ज्वला योजनाच सरकारने गुंडाळली तर आश्चर्य वाटणार नाही. असाच प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीतही सुरु आहे. निवडणुकीत मतांची बेगमी होताच सरसकट लाभ दिल्यानंतर आता वेगवेगळे… pic.twitter.com/lRGhe7TBZO
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 9, 2026
सबसिडी सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4
2016 साली पंतप्रधानउज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 14.2 किलोचे 12 एलपीजी सिलेंडरवर सबसिडी मिळत होती. मात्र त्यानंतर ही संख्या कमी होऊन 9 इतकी झाली. तर आता नवीन निर्णयानुसार, त्यात आणखी कपात करण्यात आली असून या योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात केवळ 4 सिलेंडरवरच सबसिडी देण्यात येणार आहे.