Sanjay Raut : 16 पानांच्या FIR मध्ये फक्त एकच पान कसं बाहेर आलं? दिशा सालियन केसमध्ये संजय राऊत यांचा दोन नेत्यांच्या भेटीकडे इशारा

Sanjay Raut : "मी कधीही आरोप करत नाही. मी वस्तूस्थिती सांगतो. आम्ही लढतोय, लढत राहू. अशा कोणत्याही अनैतिक दबावापुढे माझा शब्द नीट लक्षात घ्या अनैतिक दबावापुढे, अशा प्रकारची अनैतिक दबावाची प्रकरण देशभरात सुरु आहेत. या केंद्रातल्या सरकारला जनतेच्या रोषाला सामोर जावं लागतय. अशा प्रकारच्या घटना करुन ते लोकांचं मन विचलित करु इच्छितात" असा दावा राऊत यांनी केला.

Sanjay Raut : 16 पानांच्या FIR मध्ये फक्त एकच पान कसं बाहेर आलं? दिशा सालियन केसमध्ये संजय राऊत यांचा दोन नेत्यांच्या भेटीकडे इशारा
Disha Salian-Aaditya Thackeray
| Updated on: Sep 15, 2026 | 10:18 AM

दिशा सालियान प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आल्यानंतर त्यांचा बचाव करताना संजय राऊत यांनी काही दावे केले आहेत. “य़ाच लोकांची सोनिया गांधीं विरोधात, डीएमके कुटुंबाविरोधात मोहिम सुरु आहे. याच लोकांनी चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाविरोधात मोहिम सुरु केली. याच लोकांनी ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबाविरुद्ध मोहिम सुरु केली. त्यांनीच ठाकरे कुटुंबाविरुद्ध मोहिम सुरु केली. कोणाला तरी भिती वाटतेय सर्वोच्च न्यायालयाने जर 10 व्या शेड्यूल नुसार निर्णय घेतला तर महाराष्ट्राच राजकारण बदलून जाईल. ठाकरे कुटुंब राजकारणाच्या केंद्रस्थानी येईल. म्हणून हे सर्व सुरु आहे. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. सीबीआयने तटस्थपणे तपास करावा” असं संजय राऊत म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, “मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार नाही. प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. हे कोर्ट आहे का? कोणाचे वडिल, भाऊ कोण काय म्हणतं यावर खटला उभा राहत नाही. ते काल काय म्हणाले, आज काय म्हणतायत आमच्यासाठी हा विषय संपला आहे. आम्ही लढू. आमचं संपूर्ण आयुष्य संघर्षात गेलं. खोटे आरोप, बदनामी आमच्या वाट्याला आली”

शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणाचा विषय काढलाय असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. “सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात घडामोडी होतील. त्याचा परिणाम देशभरात होईल. त्यासाठी तटबंदी निर्माण करायची हा पहिला विषय आहे. आम्ही डिलिमिटेशनला पाठिंबा देत नाही. म्हणून त्यासाठी दबाव आणण्याच्या प्रयत्नाचा हा भाग असू शकतो” असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्रातील अन्यायाविरुद्ध आदित्य ठाकरे लढत आहेत. आदित्य ठाकरे केंद्रस्थानी आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणं ते बाहेर काढत आहेत. म्हणून हे बाहेर काढलं असावं. पण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही” असा दावा संजय राऊत यांनी केला.

तो कागद बाहेर आला

“सर्व बातम्या मॅनेज आहेत. 16 पानांच्या एफआयआरमध्ये फक्त एकच पान कसं बाहेर येतं. त्याच्या बातम्या केल्या जातात. सह्याद्री अतिथि गृहावर एक बैठक झाली. रविवारच्या त्या बैठकीनंतर दोन महान नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. एशियाटिक लायब्ररीत ते गेले. त्या बैठकीत प्रवासात ठरल्यानुसार, एफआयआर लिहिला गेला, तो कागद बाहेर आला” असा दावा संजय राऊत यांनी केला.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us