‘टांगा पलटी’वरुन जहरी टीका! भाजप विरुद्ध संजय राऊत ‘सामना’
जशीजशी निवडणूक जवळ येतेय तशी शाब्दिक चकमक वाढू लागला आहे. दोन्ही बाजुने आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. टीका करताना मर्यादा ओलांडली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा असा नवा पांयडा तर पडणार नाही ना अशी भीती मतदारांच्या मनात आहे.

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा टांगा पलटी केल्याची टीका केली. त्यानंतर संजय राऊत यांची भाषाच घसरली. शिंदेंसह भाजपवर टीका करताना, राऊतांनी वादग्रस्त शब्द वापरले. प्रचारातली टीकेची धार शिवराळ भाषेपर्यंत कशी घसरली, हे राऊतांच्या भाषेतून स्पष्ट दिसतंय. त्यानंतर शिंदे गटाकडून शिरसाटांनीही राऊतांना नाच्या म्हटलं. भाजपनं लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध इंडिया आघाडी अशी केलीये. फडणवीसांनीही प्रचारात भाजपकडे मोदी नावाचं इंजिन असून विकासाची गाडी जोरात असल्याचं म्हटलं. तर संजय राऊतांनी पंतप्रधानांना भुताटकीची उपमा दिली.
भाजप विरुद्ध संजय राऊत सामना
सध्या भाजप विरुद्ध संजय राऊत असा सामना सुरु झालाय. राऊतांसोबतचा हा टीकेचा सामना रद्द झालेली नोट ते ढब्बू पैशांपर्यंत आली. अर्थात त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्याच बोईसरच्या सभेतील वक्तव्यापासून झाली. महाराष्ट्रात मोदींचं नाणं नाही तर ठाकरे आणि पवारांचंच नाणं चालणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या याच टीकेला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी प्रत्युत्तर ट्विट करत प्रत्युत्तर दिलं.
महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर ‘कवडीमोल’ ठरवून टाकलं. बाकी आज कधी नाही ते तुम्ही लोकलनं प्रवास केला, यावेळी मुंबईकरांशी चर्चा केली असती तर तुम्हाला ‘मोदी की गॅरंटी’ या नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता. देशातील जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे. महाराष्ट्रातही ‘मोदी की गॅरंटी’च चालणार असं म्हटलं.
राऊतांची मोदींवर टीका
यावरुन संजय राऊतांनी मोदींना रद्द झालेली 2 हजारांची नोट तर बावनकुळे यांना ढब्बू पैसा म्हटलं आणि बावनकुळेंना ढब्बू पैसा म्हटल्यावर भाजप पुन्हा आक्रमक झाली. शिवकालीन ढब्बू पैशाचं मोल राऊतांना कळणार नाही, असं प्रत्युत्तर भाजपनं दिलं.
उबाठा गटानं शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा वारसा सोडला आणि इटालियन राज्याची चाकरी सुरू झाली. त्यामुळे शिवकालीन ढब्बू पैशाचं संजय राऊतांना काय मोल कळणार? असं भाजपने म्हटलं. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 6 दिवस बाकी आहे. त्यामुळं पहिल्या फेजमधील अंतिम टप्प्यातील शाब्दिक चकमकही टोकाला पोहोचली आहे.