Sanjay Raut : कारसेवकांनी धैर्य, संयम पाळला असता, तर राम मंदिर झालं असतं का? संजय राऊतांचा थेट संघाला सवाल

संजय राऊत यांनी राम मंदिर चोरीप्रकरणी संघाच्या संयमाच्या आवाहनावर टीका केली. कारसेवकांनी पूर्वी धैर्य राखले असते तर मंदिर झाले नसते, असा त्यांचा सवाल आहे. संघाची भूमिका चोरांना पाठिशी घालणारी असून, भाजपने रामभक्तांऐवजी स्वतःचा बचाव केल्याचा आरोप त्यांनी केला. राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी करत शिवसेनेने आंदोलनाची घोषणा केली आहे.

Sanjay Raut : कारसेवकांनी धैर्य, संयम पाळला असता, तर राम मंदिर झालं असतं का? संजय राऊतांचा थेट संघाला सवाल
संजय राऊतांनी थेट संघाला सवाल केला आहे.
| Updated on: Jul 04, 2026 | 12:48 PM

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया आली आहे. या प्रकरणात संयम आणि धैर्य ठेवण्याचं आवाहन संघाने केलं आहे. संघाच्या या आवाहनावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. कारसेवकांनी त्या काळात धैर्य आणि संयम ठेवला असता तर राम मंदिर झालं असतं का? असा सवाल करतानाच त्यावेळी कारसेवकांना संयम आणि धैर्याचं आवाहन का केलं नाही? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत हे मीडियाशी बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिरातील चोरीवर भूमिका जाहीर केली आहे. संघाची ही भूमिका राम मंदिरातल्या सर्व प्रकारच्या चोरी आणि लुटमारी बाबत ही चोरांना पाठिशी घालणारी आहे. मुळात या राम मंदिरासाठी अयोध्येत कारसेवकांनी संयम पाळला असता, धैर्य पाळला असता तर राम मंदिर झालं नसतं. संयमाचा बांध तुटला आणि कारसेवकांनी छातीवर गोळ्या घेतल्या. त्या घुमटावर चढून ढाचा उद्ध्वस्त केला. त्यातून राम मंदिर उभं राहिलं. तेव्हा संयम पाळा असं का नाही सांगितलं? संयम पाळा, धैर्य पाळा कायदेशीर मार्गाने आपण लढा देऊ असं का सांगितलं नाही? असा सवालच संजय राऊत यांनी संघाला केला आहे.

बलिदान आम्ही केलं, तुम्ही नाही…

साधारण एक हजार कारसेवकांचा बळी गेला. मुंबईत दंगल झाली. त्यात 350 शिवसैनिकांची, हिंदुंची आहुती गेली. त्यात बीजेपी आणि संघ नव्हता. त्यानंतर बॉम्बस्फोट झाला. त्यात मराठी माणसं आणि हिंदू मेले. संयमाच्या गोष्टी सर्व काही झाल्यावर करता? पण बलिदान आणि त्याग आम्ही केला. तुम्ही नाही. हे सांगावसं वाटतं. कारवाई होईल. सरकार तुमचं आहे. पण कारवाई होताना दिसत नाही. एखाद्या गुन्ह्यात जेव्हा पाच लोकं सहभागी असतात. तेव्हा ती चोरी नसते, तो दरोडा असतो. इथे पाच पेक्षा जास्त लोकं आहेत. त्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडला आहे. कारवाई मंदिराच्या ट्रस्टवर झाली पाहिजे. ते कर्तव्यात चुकले आहेत, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

संघाने भाजपच्या बाजूने…

शिवसेनेने राम मंदिर चोरीविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यावर, राम मंदिराच्या लुटीविरोधात उद्धव ठाकरेंनी घोषणा केल्यानंतर संघाने भूमिका मांडली. संघाने आधी का नाही भूमिका मांडली? या आंदोलनाची ठिणगी पडली तर वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहीत आहे. राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करा. राम मंदिरासाठी एक पक्षीय ट्रस्ट नको. हा भाजपचा ट्रस्ट आहे. संघाने भाजपच्या बाजूने बोलू नये. राम भक्ताच्या बाजूने बोलावं. भाजपची कातडी वाचवण्यासाठी संघ स्वत:ची ढाल देत आहे. मुंबईत आंदोलन उद्या आहे. महाराष्ट्रात पसरणार. देशभरात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

Follow Us