Sanjay Raut : लोक नारायण राणेंबद्दल राजकीय चर्चेत जे बोलायचे, ती गोष्ट इतक्या वर्षांनी राऊतांनी प्रामाणिकपणे केली मान्य
"विधेयकं मंजूर करुन घेण्यासाठी खरंतर फोडाफोडी सुरु आहे, आकडा मिळवण्यासाठी. या सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. तुमचे 240 खासदार निवडून आले. 240 च्या पुढे तो आकडा 300 पर्यंत कसा गेला. याचा हिशोब जनतेला दिला पाहिजे"

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि पक्ष कोणाचा? यावर सध्या दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाने हा खटला दाखल केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘जनतेच्या न्यायालयात याचा निर्णय झाला आहे. आधी आम्ही 40 होतो, आता 60 झालो आहोत’ त्यावर संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा दाखला दिला. नारायण राणे यांचं योगदान मान्य केलं. “नारायण राणे यांनी पक्ष सोडला. नारायण राणे मोठे नेते होते. पक्षासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या हे मान्य केलं पाहिजे. पक्षवाढीसाठी त्यांनी योगदान दिलं होतं हे मान्य केलं पाहिजे. मी कधी खोट बोलत नाहीत” असं संजय राऊत म्हणाले. “विशिष्ट स्थितीमध्ये त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी असा दावा केला नाही की, शिवसेना माझी आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. तो पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. तो चालना नाही मग ते भाजपत गेले. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला मनसे स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी असा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता” असं राऊत म्हणाले.
“शिवसेना हा जो पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरे त्याचे प्रमुख आहेत. आता उद्धव ठाकरे प्रमुख आहेत. मला पक्षाने खासदार केलय. मी पक्षाच्या आदेशाला बांधिल आहे. मी काही वेगळा निर्णय घेणं म्हणजे पक्षाच्या भूमिकेशी प्रतारणा करण्यासारखं आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जे 40 आमदार आहेत, ते एखाद्या पोल्ट्रीमध्ये कोंबडीने अंडी उबवली, त्यातून हे आमदार बाहेर पडले असं नाहीयना. एकनाथ शिंदे 40 अंडी घेऊन गेले, ती त्यांनी उबवायला दिली असं नाहीय. ते 40 आमदार, खासदार पक्षाने दिलेले आहेत. पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. निवडणूक आयोगाने दबावाखाली शेण खाल्लं. या देशातील संवैधानिक संस्था दबावाखाली आहेत. विकल्या गेल्या आहेत” असा आरोप राऊतांनी केला.
दोघांमध्ये काही आयक्यू आहे असं मला वाटत नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत, त्यांच्यात संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा होईल. यावर संजय राऊत उपरोधिकपणे म्हणाले की, “तू किती फोडले, मी किती फोडले आणि अजून किती फोडणार या पलीकडे दोघांमध्ये काही आयक्यू आहे असं मला वाटत नाही आणि दोघे हसणार. महाराष्ट्रात अदानीला कुठल्या प्रॉपट्या अजून द्यायच्या आहेत. उद्योगपतींना अजून काही विकता येईल का? बीईएसटी विकायला काढली आहे. ती अदानीला देण्यासंदर्भात विचार सुरु आहे. मेट्रो अंबानीला दिली. विकण्यासाठी अजून काही शिल्लक आहे का, ही दोघांमध्ये चर्चा होईल”
