Sanjay Raut : बारामती पोटनिवडणुकीवरून राऊतांच्या शरद पवार गटाला कानपिचक्या? म्हणाले, इतर कोणी…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक चर्चेत आहे. शरद पवार गटाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत मतभेद दिसू लागले आहेत. संजय राऊत यांनी शरद पवार गटाला कानपिचक्या देत, इतर कोणी निवडणूक लढवल्यास विरोध करू नये असे सूचित केले. यामुळे आघाडीत बारामतीवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut : बारामती पोटनिवडणुकीवरून राऊतांच्या शरद पवार गटाला कानपिचक्या? म्हणाले, इतर कोणी...
Sanjay Raut
| Updated on: Apr 03, 2026 | 1:25 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाकडे आहे. मात्र पवार गटाने निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याला ठाकरे गटानेही समर्थन दिलं आहे. या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार गटाला कानपिचक्याही दिल्या आहेत. त्यामुळे आघाडीत बारामतीवरून वाद असल्याचं स्पष्ट होत आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. महाविकास आघाडी म्हणून दोन्ही निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बारामतीच्या जागेवर शरद पवार गटाचा अधिकार आहे. या संदर्भात त्यांच्याशी आमची चर्चा होईल. या जागेबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे बारामती विधानसभेची निडवणूक होत आहे. कौटुंबिक धर्म म्हणून शरद पवारांचा पक्ष कदाचित ही निवडणूक लढणार नाही. इतर लढतील तर त्यांना विरोधी करता कामा नये. कारण शेवटी लोकशाही आहे. एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

मंत्र्यांच्या संवेदना ठार

मी संघटनात्मक बांधणीसाठी जळगावात आलो आहे. लोकसभेसाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली आहे. राज्यात असंख्य प्रश्न आहेत. मात्र कोणीही मंत्री, नेता त्यावर बोलताना दिसत नाही. जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. शेती उद्ध्वस्त झाली आहे. अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पालकमंत्री अथवा सरकारकडून शेतकऱ्यांपर्यंत संवेदना व्यक्त केली जात नाहीये. आमदार, मंत्र्यांकडून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली गेली पाहिजे. पण या मदतीसाठी आमदार आणि मंत्री पावले उचलताना दिसत नाहीये. हे सरकार असंवेदनशील आहे. सरकारमधील मंत्र्यांच्या संवेदना ठार झालेल्या आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

कुठे आहेत संकटमोचक?

कुठे आहेत गिरीश महाजन? ज्यांना संकट मोचक म्हणतात ना? शेतकऱ्यांच्या संकटावेळी हे संकटमोचक कुठे असतात? ते फक्त राजकीय संकटमोचक आहेत का? शेतकऱ्यांवर संकट येतात तेव्हा हे संकटमोचक काय करताना दिसत नाही. फक्त आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे, पक्ष फोडणे, हेच फक्त संकटमोचकाचे कर्तव्य आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

तेव्हा आम्ही बोलू

लेखिका अरुणा साबणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोंदू खरात बाबत पत्र लिहिलं आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे. नाशिकचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी या प्रकरणांमध्ये चांगल्या पद्धतीने तपास केलेला आहे. कोणाला दोषी ठरवायचं आणि कोणाला नाही हे एसआयटी तसेच गृहखातं आणि नाशिकचा पोलीस ठरवतील ठरवेल. या प्रकरणात संपूर्ण तपास पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल होईल त्यावेळी आम्ही बोलू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणाला वाचवला हे कोणाला दोष ठरवून आहे हे आताच्या क्षणाला बोलणं उचित ठरणार नाही.

Follow Us