Kolhapur : इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची, सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना हाक
आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्तेतून भाजपाला खाली खेचून महाविकास आघाडीची सत्ता आणून परिवर्तन घडवूया, अशी हाक कार्यकर्त्यांना सतेज पाटील यांनी दिली आहे.
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील मागील पाच वर्षात नगरपालिकेत सत्तेत असलेल्यांनी काय कारभार केला हे जनतेला कळाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्तेतून भाजपाला खाली खेचून महाविकास आघाडीची सत्ता आणून परिवर्तन घडवूया, अशी हाक कार्यकर्त्यांना सतेज पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला पुन्हा बलशाली बनवू, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे बोलताना केले. त्याचबरोबर पुढील महिन्यात इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी येथे जनता दरबार भरवण्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे ते म्हणाले.
अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पालकमंत्री सतेज पाटील हे शुक्रवारी विविध विकासकामांच्या निमित्ताने इचलकरंजीत आले होते. त्यावेळी त्यांनी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीला सदिच्छा भेट दिली. काँग्रेसभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विठ्ठलराव डाके होते. यावेळी शहरातील अनेक महिला आणि तरुणांनी पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचा नामदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भाजपला जागा दाखवून देऊ
जनता सुज्ञ असून पाच वर्षात शहराचा विकास करण्याऐवजी शहर भकास करणार्यांना आगामी निवडणुकीत निश्चितपणे जागा दाखवून देईल. काँग्रेस पक्षाने सातत्याने सामान्य माणूस आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. शहराचा सर्वांगिण विकास हवा असेल तर नगरपालिकेत सत्ता असणे आवश्यक आहे, असं सतेजा पाटील म्हणाले. आगामी निवडणुकीत निश्चितपणे महाविकास आघाडीची सत्ता असेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पाटलांचे स्वागत शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबासो कोतवाल यांनी केले. प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी, काँग्रेस पक्षाची भूमिका आणि सद्यस्थिती, भाजपाकडून सुरु असलेले स्वार्थी राजकारण, नगरपालिकेतील भाजपाची सत्ता आणि शहराची दूरवस्था या संदर्भात सविस्तर मांडणी करताना शहराच्या विकासासाठी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणे गरजेचे असल्याचे सांगत शहराच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी केली. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.