गांधींनी इंग्रजांना घालवलं, मोदी काय चीज आहे?; शरद पवार यांचा हल्लाबोल

आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार संपला. मात्र, प्रचार संपण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला. शरद पवार यांनी आज पुण्यात आणि बीडमध्ये दोन सभा घेतल्या. या दोन्ही सभेतून पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विकासाच्या मुद्द्यावर घेरलं.

गांधींनी इंग्रजांना घालवलं, मोदी काय चीज आहे?; शरद पवार यांचा हल्लाबोल
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 11, 2024 | 8:06 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत काँग्रेसवर टीका करतात. मात्र त्यांनी काय केलं आणि काय करणार त्यावर बोलत नाहीत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्याचा उल्लेख नाही त्याचा उल्लेख मोदी करतात. भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतलं जाईल, असं कुणीही बोललेलं नसताना मोदी तसं बोलत आहेत. सामान्य माणसाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असं बोललं जातं आहेत. मोदींकडून व्यक्तिगत हल्ले केले जात आहेत, असं सांगतानाच जर गांधींनी इंग्रजांना घालवलं तर मोदी काय चीज आहे? असा सवालच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला.

पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी हा सवाल केला. या देशात गांधी, नेहरूंचा विचार पक्का झाला. यात काय चुकलं?, असं सांगतानाच त्यांच्या विरोधात कुणी बोललं की लगेच तुरंगात टाकायचं. याचा अर्थ देशात हुकूमशाही आणायची आहे. मी काय… उद्धव ठाकरे काय… आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही. उलट त्यांना आम्ही सत्तेच्या बाहेर काढू, असं शरद पवार म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही

शरद पवार यांची आज बीडमध्येही सभा झाली. या सभेत त्यांनी मोदींवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून टीका केली. देशाचे राज्य नरेंद्र मोदींच्या हातात आहे. शेतीमालाला किंमत नाही, शेतकऱ्यांसाठी मोदींनी काही केले नाही. दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या हजारो शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या भावासाठी आंदोलन केले. हे राज्यकर्ते शेतकरी विरोधी आहेत. शेतकरी विरोधी लोकांच्या हाती आम्ही सत्ता देणार नाही. दिल्ली आणि गुजरातमध्ये महिलांवर अत्याचार झाले. बिल्किस बानू या महिलेवर अत्याचार केले. त्या आरोपीला भाजप सरकारने काही वर्षांनी सोडून दिले. झारखंड आदिवासींचे राज्य आहे, तेथील मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही तुरुंगात टाकलं. देशात हुकूमशाहीचीही सुरुवात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

बौद्धांबद्दल द्वेष

मुस्लिम, शीख आणि बौद्धांना एकत्रित ठेवायला पाहिजे. मोदींच्या मनात मुस्लिम आणि दलितांबद्दलचा द्वेष कायम आहे. त्यामुळे मतदारांनी यांना हरवायला पाहिजे, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

Follow Us