AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मी शुक्लांच्या बदलीवर संजय राऊतांचा जबरदस्त टोला, म्हणाले “फडणवीसांच्या लाडक्या ताईसाहेब…”

निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना आधी कायद्याने वागायला सांगा. आहे तो कायदा तुम्हाला पेलवत नाही, पाळता येत नाही आणि निघालेत समान नागरी कायद्याचे शिवधनुष्य पेलायला!", असा टोला संजय राऊतांनी लगावला.

रश्मी शुक्लांच्या बदलीवर संजय राऊतांचा जबरदस्त टोला, म्हणाले फडणवीसांच्या लाडक्या ताईसाहेब...
| Updated on: Nov 05, 2024 | 8:59 AM
Share

Sanjay Raut on Rashmi Shukla Transferred : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंसह विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. आता यावर शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. आपल्या देशात अशा निष्पक्ष यंत्रणा आज टिकवल्या आहेत काय? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध विषयांवरही भाष्य केले. त्यासोबतच संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांबद्दलही भाष्य केले.

“आहे तो कायदा पाळता येत नाही”

“लोकशाही ही कायद्याच्या पुस्तकात किंवा न्यायालयात जन्मत नसते, तर लोकांच्या इच्छेतून फुलत असते. पण जनतेच्या इच्छा सरळ पायदळी तुडवल्या जात आहेत. जनतेच्या इच्छेवर पैशांचा, आमिषांचा मारा होतो व शेवटी लोकशाहीचे सगळेच मुसळ केरात जात असते. विश्वासघातातून बनलेली सरकारे पोलीस यंत्रणांचा वापर करून निवडणुकांत धाकदपटशाचा मार्ग स्वीकारताना दिसतात व निवडणूक आयोग मूकदर्शक बनून स्वस्थ बसतो. भारतीय निवडणुकांतील ढोंगबाजी व गैरप्रकार याबद्दल निवडणूक आयोग गंभीर नाही. आजचे सरकार तर याविषयी कधीच गंभीर नव्हते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंड येथे सांगितले, ‘काही झाले तरी समान नागरी कायदा आणणारच!’ गृहमंत्र्यांना आमचे सांगणे आहे, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना आधी कायद्याने वागायला सांगा. आहे तो कायदा तुम्हाला पेलवत नाही, पाळता येत नाही आणि निघालेत समान नागरी कायद्याचे शिवधनुष्य पेलायला!”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“देशात अशा निष्पक्ष यंत्रणा आज टिकवल्या आहेत काय?”

“महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे बसवले व त्यांच्या हातात निवडणुकांची सूत्रे फडणवीस वगैरे लोकांनी दिली. यावर विरोधकांनी वारंवार आवाज उठवल्यावर काल निवडणूक आयोगाने फडणवीसांच्या लाडक्या ताईसाहेबांना पदावरून दूर केले. कोणत्याही लोकशाहीत निवडणुकांचे अनन्यसाधारण महत्त्व असते व त्यावर देखरेख व नियंत्रण हे निष्पक्ष व सक्षम यंत्रणेकडूनच व्हायला हवे. आपल्या देशात अशा निष्पक्ष यंत्रणा आज टिकवल्या आहेत काय? निवडणुकाच निष्पक्ष पद्धतीने पार पाडल्या जात नसतील तर इतर संस्थांचे काय घेऊन बसलात?” असा सवालही संजय राऊतांनी विचारला.

“…तर विधान परिषदेतील आमदारांचा आकडा 500 वर करावा लागेल”

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी हजारो बेरोजगारांचे अर्ज आले. त्याआधी लाखांनी आपापल्या पक्ष कार्यालयात मुलाखती दिल्या. यातून मग जे ‘फेल’ ठरले ते नाराज, बंडखोर, झुंडखोर रिंगणात उरतात. त्यातले काहीजण सच्चे असतात, पण बंडखोरांच्या कोलाहलात सच्चेपण हरवून जाते. तरीही माघारीचा दिवस शांततेत पार पडला. आता रिंगणातल्या पहेलवानांचे भविष्य जनता ठरवेल! दिवाळीचे फटाके फुटत असताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्वपक्षीय बंडखोरीचे फटाके फुटले. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासारख्यांनी ‘बंड’ केल्याचा आव आणून उमेदवारी अर्ज भरल्याचा ‘ताव’ मारला, पण फडणवीसांनी ‘ईडी’चा डाव लावताच गोपाळरावांचा आव आणि ताव आणि भाव कोसळला व त्यांनी माघार घेतली. या काळात नाराजांना व बंडखोरांना कोणी काय गाजरे दाखवली असतील बरे? माघार घेण्यासाठी ज्या मनधरण्या केल्या असतील व त्यातील कित्येकांना त्या-त्या पक्षांच्या नेत्यांनी ‘विधान परिषदा’ महामंडळांची आश्वासने दिली असतील, याची गणती नाही. शेकडो जणांना ‘तुला या वेळी विधान परिषदेत पाठवतोच. आता माघार घे!’ या एका आश्वासनावर अनेकांनी माघार घेतली. या हिशेबात राज्य विधान परिषदेतील आमदारांचा आकडा 500 वर करावा लागेल व हजारावर महामंडळे निर्माण करावी लागतील, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

Follow Us
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर