
सांगली जिल्ह्यातून एक धक्कादाक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. स्व. राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचत लिंबू फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सांगलीमध्ये जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं या घटनेची आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. पुरोगामी जिल्हा अशी राज्यात सांगलीची ओळख आहे, मात्र तरी देखील अशा घटना घडत असल्यानं आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. वाळवा तालुक्यातील येल्लूर येथे ही घटना घडली आहे.
नुकत्याच महानगरपालिका निवडणुका पार पडल्या असून, आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील होणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी होतच असते, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैर झडतात, मात्र हे सर्व सुरू असतानाच आता सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरोगामी जिल्हा, पुरोगामी चळवळीला ताकद देणारा जिल्हा अशी सांगली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र याच सांगली जिल्ह्यात ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वाळवा तालुक्यातील येल्लूर येथे स्व. राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर काळी जादू करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान नुकतेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्यावर टीका करताना स्व. राजाराम बापू पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होतं, त्यामुळे जिल्ह्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता, हे प्रकरण ताजं असतानाच आता कोणीतरी राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान नेमकं हा प्रकार कोणी केला, त्यामागे त्याचा उद्देश काय होता? याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. मात्र या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.