मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत चुरस, भाजपाची दोन पॅनल, कपिल पाटील विरोधात किसन कथोरे
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी हे भाजपाच्या विरोधात नव्हे तर प्रदेशाध्यक्षांचा विरोध डावलून हे सहकार पॅनल उभे केले असल्याचा आरोप राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला आहे.

ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. सहकार क्षेत्र हे राजकीय पक्ष राजकारण विरहित असावे अशी धारणा आहे.परंतु या सहकार क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत. मात्र, भाजपाने या निवडणूकीत दोन पॅनल उभी केल्याने पेच निर्माण झाला आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे स्वतः ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्या उमेदवारांचे ‘परिवर्तन पॅनल’ उभे करून सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वाट्याला अनुक्रमे चार आणि तीन जागा आलेल्या आहेत. कपिल पाटील यांच्या या घोषणेनंतर त्यांचे पक्षातीलच राजकीय विरोधक भाजप आमदार किसन कथोरे यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या मदतीने ‘सहकार पॅनल’ उभे करीत कपिल पाटील यांना तगडे आव्हान दिले आहे.
ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील ‘परिवर्तन पॅनल’ हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून या परिवर्तन पॅनलचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. सहकार पॅनल हे आमच्या सोबत असलेल्या उमेदवारांना नाकारत नाहीत. सहकार पॅनलमध्ये कोणते पक्ष एकत्र आले याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. ते सुद्धा आमच्या उमेदवारांना आपलेच आहेत असे सांगत आहेत. शिवसेना उमेदवारांना मते देऊ नका असे सांगत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करीत आमच्या सोबत शिवसेना आहे.त्यांना आम्ही सात पैकी तीन जागा दिल्या आहेत.सहकार पॅनलमध्ये शिवसेना आणि भाजपासाठी प्रत्येकी एकच जागा सोडली आहे.आता दोन्ही पक्षाला मानणारा मतदार निश्चित विचार करेल असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजपा प्रदेशाध्यक्षांवर सुद्धा वार आहे – पाटील
माझ्या विरोधात सर्व विरोधक एकवटले याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ‘परिवर्तन पॅनल’ अस्तित्वात आल्यानंतर ते सैरभैर झाले आहेत.यामध्ये भाजपा आमदाराने भाजपा प्रदेशाध्यक्षांचा आदेश डावलून ‘सहकार पॅनल’ला पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारांचा आमच्यावर विश्वास असल्याने ही बँक परिवर्तन पॅनलच्या ताब्यात येईल हा विश्वास आम्हाला आहे. मी ‘सहकार पॅनल’ हा ‘परिवर्तन पॅनल’वर कुरघोडी करण्याचा प्रयत्न मी मानत नाही. राजकारणात वेगवगेळ्या निवडणुका आपण लढताना शक्तीस्थळावर वार केला जातो. हा माझ्यावर नाही तर भाजपा प्रदेशाध्यक्षांवर सुद्धा वार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने परिवर्तन पॅनल बनवले आहे. हे पॅनल ताकदवर होत असल्याने त्यांच्याकडून शक्तीस्थळावर हल्ला केला जात आहे. आमदार किसन कथोरे यांनी माझ्या विरोधात टोकाची भूमिका घेतल्याने मी सुद्धा त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे असेही कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
