महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले, तीन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत, कुठे घडली घटना
दोन विविध घटनात महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत तर तीन सख्या बहिणींचा पोहताना दुर्दैवी अंत झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत आणखी तिघा तरुण मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर येथे महाशिवरात्रीनिमित्त नदीवर अंघोळीसाठी कुटुंबियासोबत गेलेल्या तीन सख्ख्या बहिणींचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज घडली. यापैकी एकीचा मृतदेह सापडला असून दोघींचा शोध सुरू आहे. महाशिवरात्री निमित्त बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या कुटुंबातील आठ जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते. यावेळी नदी पात्राचा अंदाज न आल्याने तिघा सख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या कुटुंबातील एक मुलगा आणि महिला दगडाला धरुन राहिल्याने कशाबशा वाचल्याचे म्हटले जात आहे.
बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल आपल्या कुटुंबासह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रातअंघोळीसाठी गेले होते.नदीच्या पात्रात उतरल्यानंतर काही वेळातच कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्ख्या बहिणी पाण्याचा अंदाज आल्याने खोलात गेल्या.त्यांना पोहता येत नसल्याने त्या बुडायला लागल्या तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात खडकाला धरुन राहिल्याने कसेबसे बचावले. यावेळी त्यांची आरडाओरड सुरू असूनही कोणीच मदतीला नव्हते. यातील कुटुंबातील मुलगा आणि महिला पात्रातील खडक हाताला लागल्याने त्याला पकडून राहिले. मात्र तीन बहिणी बेपत्ता पाण्याच्या प्रवाहात नाहीशा झाल्या. यातील कविता मंडल हिचा मृतदेह मात्र काही वेळाने मिळाला. मात्र दोघी बहिणींचा शोध सरु करण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच पोलीसांनी धाव घेतल्याने खडकाला पकडून असलेल्या मुलाला आणि महिलेला वाचवण्यात कसेतरी यश मिळाले. महाशिवरात्री निमित्ताने अनेक भाविक नदीपात्रात अंघोळीसाठी जात असतात. परंतू पोहण्याचा जराही अनुभव नसल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
तीन युवकही बुडाले
अशाच एका अन्य घटनेत, महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीत बुडाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. या तिघा दुर्दैवी तरुणांचा सध्या शोध सुरू आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे युवक शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. तुषार शालिक आत्राम ( वय १७), मंगेश बंडू चणकापुरे ( वय २० ), अनिकेत शंकर कोडापे ( वय १८ ) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. आता चंद्रपूर येथून बचाव पथक पाठवण्यात आले असून शोध घेतला जात आहे.
