बारावीचा पहीलाच पेपर, विद्यार्थ्यांचा लोकलमधून पडून दुर्देवी मृत्यू, प्रचंड गर्दीमुळे तोल गेला
बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना डोंबिवलीतील एका विद्यार्थ्यांचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल गेल्याने या विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचे म्हटले जात आहे.

बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या असताना आज पहिला पेपर असताना गर्दीमुळे लोकलमधून पडून डोंबिवलीतील बारावीच्या विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीच्या घटनेमुळे लोकलमधील गर्दीचा प्रश्न उभा राहिला आहे. सोहम सचिन कठरे ( वय १८ ) असे या दुर्देवी विद्यार्थ्याचे नाव असून सकाळी ९.१५ वाजता सुमारास कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
बारावीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेला सोहम सचिन कठरे हा ( वय १८ वर्षे ) लोकलच्या डब्यातून तोल जाऊन खाली पडला. सकाळी ९.१५ वाजता सुमारास कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे सोहमचा तोल गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोहम डोंबिवली येथे राहत होता आणि कळव्यातील न्यू कळवा हायस्कूल येथे १२ वी सायन्समध्ये तो शिक्षण घेत होता.
जवळपास परीक्षा केंद्र द्यावीत
डोंबिवली येथे राहाणाऱ्या सोहम याचे कळवा येथील मनिषा विद्यालय येथे परीक्षा केंद्र होते. बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या रेल्वे सुरक्षेसाठी प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला हवी अशी मागणी सोहमच्या नातेवाईक यांनी केली आहे. तसेच रेल्वे, शिक्षण मंडळ, शिक्षण मंत्री आणि शाळा प्रशासन यांना सामाजिक कार्यकर्ते भेटून निवेदन देणार आहेत. रेल्वेने लांबचा प्रवास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जवळपास परीक्षा केंद्र द्यावीत अशी मागणी करणार आहेत..
