कारगिल विजय दिवस: मुंबईतील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत विशेष व्याख्यान, सैन्यदलाच्या शौर्यावर टाकला प्रकाश

कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या वतीने मराठी सांस्कृतिक समिती रंगवर्धनतर्फे विद्यार्थ्यांसाठी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

कारगिल विजय दिवस: मुंबईतील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत विशेष व्याख्यान, सैन्यदलाच्या शौर्यावर टाकला प्रकाश
Kargil Vijay Diwas
| Updated on: Jul 26, 2025 | 8:27 PM

संपूर्ण देशभरात आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या खास दिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत. कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या वतीने मराठी सांस्कृतिक समिती रंगवर्धनतर्फे विद्यार्थ्यांसाठी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वीरमाता अनुराधा गोरे यांचा सन्मान करण्यात आला.

वीरमाता अनुराधा गोरे यांनी सुपुत्र शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या बलिदानाची कथा सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेत काही वर्षे सेवा देण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी यावेळी कारगिल युद्धातील अनेक वीरांची यशोगाथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली. तसेच या युद्धात नौसेना आणि वायुसेना यांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती दिली.

अनुराधा गोरे यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय सैन्याच्या कामगिरीचे अनेक अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी उद्युक्त केले. त्यांनी शौर्य आणि देश भक्तीची माहिती अधोरेखित केली. गोरे यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांचे मन जिंकले.

या खास कार्यक्रमात संचालक डॉ. सचिन कोरे, विद्यार्थी क्रियाकलाप प्रमुख डॉ. सुरंजना गंगोपाध्याय यांनीही सहभाग घेत, विद्यार्थ्यांना देशसेवेमधील अभियंत्यांचे योगदान वाढविण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रेरणादायी प्रसंगामुळे युवकांमध्ये सैन्य दलातील विविध संधी आणि त्याद्वारे देशसेवेचे सर्वोच्च कर्तव्य यांची आवड वाढवण्याचा उद्देश साध्य झाला.

यावेळी श्रीमती अनुराधा गोरे यांनी त्यांचे या विषयावरील पुस्तक संस्थेला ग्रंथालयास भेट दिले. संचालक डॉ सचिन कोरे यांनी अशी पुस्तके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.