Thailand Job Scam : म्यानमार, थायलंडमध्ये नोकरीच्या आमिषानं गेले; ‘गोल्डन ट्रँगल’च्या जाळ्यात अडकले, 800 भारतीय ओलीस, महाराष्ट्राचे…
thailand online scam : म्यानमार, लाओस, थायलंडमधून नोकरीसाठी गेलेले युवक 'गोल्डन ट्रँगल'च्या जाळ्यात अडकले आहेत. भारतातील जवळपास 800 तरुण अडकले आहेत.

म्यानमार, लाओस, थायलंडमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या आमिषाने गेलेले भारतीय तरुण कुप्रसिद्ध ‘गोल्डन ट्रँगल’च्या जाळ्यात अडकले आहेत. यात महाराष्ट्रातील 25 युवकांसह 800 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्यांना म्यानमार-थायलंड सीमेवरील कुप्रसिद्ध ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरातील अज्ञात छावण्यांमध्ये ओलीस ठेवण्यात आलं आहे.
भारतातील 800 लोकांना ओलीस ठेवल्याने समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भारतीय नागरिकांचा सुटका करण्यासाठी बीड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.
प्रकार कसा उघडकीस आला?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील 24 वर्षीय तरुणापासून या प्रकरणाची सुरुवात झाली. सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे बँकॉकमध्ये महिन्याला 70 हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. त्यानंतर हा तरुण पुण्याहून बँकॉकला 4 जून रोजी पोहोचला. त्यानंतर त्याला जबरदस्तीने म्यानमार सीमेवरील घटदाट जंगलात नेण्यात आलं. या जंगलातील गुप्त छावणीत आरोपीने त्याचे पासपोर्ट आणि सर्व कागदपत्रे ताब्यात घेतले. त्यामुळे त्याचे परतीचे मार्ग बंद झाले. या छावण्यांमध्ये तरुणांना असह्य जाच सहन करावा लागत आहे.
एका छोट्याश्या खोलीत कोंडून 18-18 तास ऑनलाइन फसवणुकीचं काम करण्यास भाग पाडलं जात आहे. काम न करणाऱ्यांना विजेचे शॉक देणे, अमानुष मारहाण करणे आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याचे समोर आलं आहे. ‘गोल्डन ट्रँगल’मध्ये अडकलेल्या एका पीडित तरुणाने जीव धोक्यात घालून पत्नीला फोन केला. त्यानंतर त्याने सर्व परिस्थिती सांगितली. त्याने जंगलात 3 जणांना ठार करण्यात आल्याचेही सांगितले. त्यानंतर या संपूर्ण सायबर गुन्हेगारीचा उलगडा झाला. या आंतरराष्ट्रीय प्रकाराची बीड पोलिसांनी दखल घेत तपास वाढवला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी महाराष्ट्रासहित भारतातील अडकलेल्या युवकांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्यासहित केंद्रीय पातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सर्व यंत्रणांशी सातत्याने संपर्कात आसल्याचेही त्यांनी सांगितले. तरुणांची सुटका व्हावी, यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडेही पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
