ठाणे हादरले ! शिवाजी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे. यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच. पण गोरगरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो.

ठाणे हादरले ! शिवाजी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप
Chhatrapati Shivaji Maharaj Hospital
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2023 | 8:18 AM

निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 11 ऑगस्ट 2023 : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा शिवाजी रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हे रुग्ण दगावल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर हॉस्पिटल प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांच्या नातेवाईक आणि डॉक्टरांकडून माहिती घेतली. आव्हाड यांनी या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार घडला आहे. तळपायाची आग मस्तकात गेलीय, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

ठाण्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात आज दिवसभरात एकापाठोपाठ एक पाच रुग्ण दगावले. याला रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व रुग्ण गंभीर अवस्थेतच रुग्णालयात आले होते. हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपाचर सुरू केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता माळगावकर यांनी दिली. या रुग्णालयात मर्यादेपेक्षा जास्त रुग्ण आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

मनसे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धाव

दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पाच रुग्ण दगावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मनसे आणि अजितदादा गटाचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमले होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमल्याने तणावाची परिस्थिती झाली होती. या घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. यावेळी आव्हाड यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे.

तळपायाची आग मस्तकात गेलीय

गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या. आज एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो. तळपायाची आग मस्तकात गेली, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

5 तास आधीच रुग्ण दगावला, तरीही उपचार सुरूच

त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर 5 तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता, परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती.

उलट 5 तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली, असा दावाही आव्हाड यांनी केली आहे.

कारवाईची अपेक्षा नाहीच

मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते. तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले आहेत.

या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत. डॉक्टर वेळेवर कामावर येत नाहीत. इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे. यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच. पण गोरगरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो, असंही ते म्हणाले.