दुर्गभ भागातील रुग्णांची फरफट थांबणार! अंबरनाथमधील डॉक्टरने साकारली खास अॅम्ब्युलन्स
रुग्णांसाठी वरदान ठरणार बाईक अॅम्ब्युलन्स! वरदान ठरणारं संधोधन करणारा अवलिया कोण? जाणून घ्या
अंबरनाथ : अंबरनाथ (Ambernath) शहरामधील एका डॉक्टरने चक्क मोबाईल ॲम्बुलन्स (Mobile Ambulence) तयार केलीय. या ॲम्बुलन्स बाईक ॲम्बुलन्स म्हणूनही संबोधलं जातंय. दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ही रुग्णवाहिका अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास आता व्यक्त केला जातोय. गेल्या काही महिन्यांत रस्त्याअभावी आणि रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची फटफट झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता अवलिया डॉक्टरने (Dr Rahul Choudhari) केलेलं संशोधन मोलाची भूमिका भविष्यात बजावण्याची शक्यताय.
दुर्गम भागातील रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रस्ता किंवा रुग्णवाहिका नसल्याने त्यांना झोळीतून नेण्याची वेळ ओढावली होती. तशा बातम्याही अनेकदा समोर आल्या होत्या. यामध्ये रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचू न शकल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू देखील ओढावतो. ही परिस्थिती पाहून व्यथित झालेल्या अंबरनाथमधील डॉ. राहुल चौधरी यांनी मोबाईल ॲम्बुलन्स ही नवी संकल्पना साकारलीय.
दोन चाकांवर ट्रॉलीसारखी तयार करण्यात आलेली ही रुग्णपेटी बाईकला किंवा सायकलला ट्रॉलीसारखी जोडून पुढे नेता येते. शिवाय यासाठी पक्क्या रस्त्याची सुद्धा गरज भासत नाही. ही रुग्णावाहिका रस्ता नसलेल्या ठिकाणी फार उपयोगी ठरेल, असा विश्वास डॉ. राहुल चौधरी यांनी व्यक्त केलाय.
डॉ. राहुल चौधरी यांनी त्यांच्या वडिलांचं नाव या बाईक रुग्णवाहिकेला दिलंय. त्यांचे वडील दिवंगत डॉक्टर अशोक चौधरी यांच्या नावाने “अशोक” ही मोबाईल ॲम्बुलन्स त्यांनी साकारलीय.
अशा प्रकारच्या आणखी मोबाईल ॲम्बुलन्स तयार करून त्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात दिल्या जाणार असल्याची माहिती डॉ. राहुल चौधरी यांनी दिली. रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी त्यांना अनेकदा दवाखान्यात किंवा रुग्णालयात वेळेत आणणं नितांत गरजेचं असतं. या बाईक रुग्णवाहिकेमुळे आता रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी मदत होणार आहे.
ग्रामीण भागात, तसंच दुर्गम किंवा अतिदुर्गम भागात रुग्णांना आणि विशेषतः गरोदर महिला, वयोवृद्ध रुग्ण यांना रुग्णालयात नेण्याकरता हमखास झोळीचा वापर केला जातो. मात्र यामध्ये रुग्णाचा अतिशय महत्त्वाचा वेळ वाया जातो.
वेळेत उपचार न मिळू शकल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्याचीही परिस्थिती उद्भवते. त्यामुळे डॉ. राहुल चौधरी यांनी तयार केलेली ही बाईक ॲम्बुलन्स ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने लाईफलाईन ठरणार आहे.