जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या उड्या, तर प्राण्यांचीही एकमेकांना वाचवण्याची धडपड; भिवंडीत मध्यरात्री काय घडलं?

भिवंडीतील कोहिनूर इमारत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धोकादायक घोषित केलेल्या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात घडला. अनेकांनी उड्या मारून जीव वाचवला, तर कुत्र्याच्या पिल्लाला आईने वाचवण्याचा प्रसंग हृदयद्रावक होता. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या थरारक घटनेने भिवंडी हादरली आहे.

जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या उड्या, तर प्राण्यांचीही एकमेकांना वाचवण्याची धडपड; भिवंडीत मध्यरात्री काय घडलं?
Bhiwandi Building Collapse
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 31, 2026 | 3:13 PM

भिवंडीमध्ये काल रात्री कोहिनूर नावाची चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. रात्रीपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अजूनही ढिगारे उपसून माणसांना काढण्याचं काम सुरू आहे. ही दुर्घटना अत्यंत भयानक होती, असं पीडितांनी सांगितलं. इमारत कोसळायला सुरुवात झाली तेव्हा काहींनी इमारतीवरून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. काहींनी मिळेल त्या मार्गाने धाव घेत धूम ठोकली. तर मुके जीवही एकमेकांना वाचवण्याची धडपड करताना दिसत होते. दुर्घटनेतील पीडीत आणि प्रत्यक्षदर्शींनी अत्यंत थरारक अनुभव सांगितला.

भिवंडीच्या नारपोलीतील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारतीच्या दुरुस्तीवेळी मोठी दुर्घटना घडली. ही चार मजली इमारत क्षणार्धात कोसळली. धोकादायक झालेल्या इमारतीचे दुरुस्ती काम सुरू असताना एकाच वेळी तीन नादुरुस्त पिलर काढल्याने इमारत कोसळल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती दिली. इमारतीला कोणताही आधार (सपोर्ट) न दिल्याने संपूर्ण संरचना ढासळली. त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कामगार आणि काही नागरिक अडकले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत अनेकांना बाहेर काढले. तसेच काहींनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला. या दुर्घटनेतील 30 ते 40 रहिवाशांचे शेजारच्या इमारतीत सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.

एनडीआरएफने 14 तासांच्या शोधमोहिमेनंतर नववा मृतदेह बाहेर काढला. आतापर्यंत 9 मृतदेह आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, भिवंडी महापालिका आणि आपत्कालीन सेवा पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे.

कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन जाण्यासाठी धडपड

आईची माया ही काही न्यारीच असते याचे जिवंत उदाहरण भिवंडीतील इमारत दुर्घटने प्रसंगी पाहायला मिळाले. रात्री 11:30 च्या सुमारास गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही तळ अधिक चार मजली इमारतीचा संपूर्ण एक विंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. रात्री एक वाजता नंतर एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. ते करत असताना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ढिगाऱ्या खालून एक कुत्र्याचे जिवंत पिल्लू बाहेर काढण्यात आले. त्यास बाहेर आणून ठेवल्यानंतर त्याची आई त्याला शोधत त्याच्याजवळ आली. आणि तिने तशाही अवस्थेत त्याला आपल्या जबड्यात उचलून घेऊन गेली.

इमारत निर्मनुष्य केली

कोहिनूर अपार्टमेंट ही 2007 मध्ये बनवण्यात आली असून या इमारतीमध्ये दोन अपार्टमेंट आहेत. एका अपार्टमेंटमध्ये 15 असे एकूण 30 रूम आहेत. परंतु कमकुवत काम असल्याने सुरवाती पासूनच इमारत धोकादायक झाल्याने पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात असल्याने सायंकाळी 6 पासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे रात्री 8 वाजता इमारत झुकत असल्याने पालिका प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत इमारत निर्मनुष्य केली.

परंतु त्यानंतर ही तळमजल्यावरील दुरुस्ती काम सुरू राहिल्याने आणि काही कुटुंबातील व्यक्ती साहित्य घेण्यासाठी इमारतीमध्ये आल्याने दुर्घटना घडल्यानंतर या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही इमारत पालिकेने धोकादायक ठरविल्याने रिकामी केली होती. परंतु तळमजल्यावर सुरू असलेल्या दुरुस्ती कामामुळे ही दुर्घटन घडली, अशी माहिती आमदार महेश चौघुले यांनी दिली आहे.

तरीही इमारतीत राहतात

या दुर्घटग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना काढण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. महानगरपालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे. धोकादायक असल्याने इमारत रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी नागरिकांनी धोकादायक इमारती रिकामी करून आपला जीव वाचवणे गरजेचे आहे. पालिकेने धोकादायक इमारतींचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडल्यानंतरही काही जण इमारतीमध्ये राहतात. त्यांना आता पोलिस बंदोबस्त घेऊन बाहेर काढावे लागेल. तर दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील कुटुंबियांना नजिकच्या समाज गृह शाळांमधून तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती महापौर नारायण चौधरी यांनी दिली आहे.

आईवडील बाहेर पडले, पण मुलगी…

या इमारतीच्या तळमजल्यावर अरविंद गुप्ता कुटुंब राहत होते. इमारत कोसळत असताना, ढिगारा खाली पडत असताना अरविंद गुप्ता आणि त्यांची पत्नी बाहेर पडले. पण मुलगी कोमल ढिगाऱ्या खाली अडकली होती. तिने आपली स्वतःची कशीबशी सुटका करून घेत आपला जीव वाचवला. इमारतीच्या दुरुस्तीचे चुकीच्या पद्धतीने काम सुरू केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे तिने सांगितले.

घरात झोपण्याचा सल्ला

या इमारतीच्या दुर्घटनाग्रस्त भागातील चौथ्या मजल्यावर सबिना बानो शाह ही महिला आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. सायंकाळी 6 वाजल्या पासूनच इमारतीला तडे पडण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे इमारतीच्या समोरच्या विंग मध्ये राहणाऱ्या कुटुंबियांनी या कुटुंबास आपल्या घरात झोपण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सबिना बानो शाह यांचे कुटुंबीय आपला जीव वाचवू शकले. पण इमारत कोसळल्याने घरातील सर्व साहित्य पैसे अडका सर्व ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची खंत तिने बोलून दाखविली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us