2252 किमीची राईड, कारगिलमध्ये फडकवला 1000 फुटांचा तिरंगा अन् सांगता डोंबिवलीच्या दहीहंडीत; रोहित आचरेकरांचा अंगावर काटा आणणारा प्रवास
2252 किमीची राईड पूर्ण करत रोहित आचरेकर यांनी कारगिलमध्ये 1000 फुटांचा तिरंगा फडकवला. त्यानंतर या मोहीमेची सांगता डोंबिवलीच्या दहीहंडीत झाली.

भारतीय सीमेवर चोख पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीतील तरुणांनी अनोखा प्रवास केलाय. त्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करून यशस्वीरीत्या पुन्हा डोंबिवली गाठलं. ‘वे टू कॉज रायडर्स क्लब’चे रोहित आचरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवली ते थेट कारगिल प्रवास केला. त्यांनी जवळपास 2252 किलोमीटरहून अधिकचा बाईक प्रवास पूर्ण केला. त्यानंतर भारताच्या सीमेवर तिरंगा फडकवला. त्यांनी जवानांसोबत रक्षाबंधन साजरी केली. त्यानंतर आज शनिवारी डोंबिवलीत परतले. यावेळी या रायडर्सचे दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने जंगी स्वागत करण्यात आलं.
गेल्या २० वर्षांपासून रोहित आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली ‘एक बंधन, रक्षाबंधन’ हा कौतुकास्पद उपक्रम राबवला जातोय. गेल्या काही वर्षांपासून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’च्या माध्यमातून या उपक्रमाला पाठबळ देत असल्याची माहिती मिळतेय. यंदा ‘शिवराष्ट्र – राष्ट्र प्रथम, वीर सर्वोपरि’ ही संकल्पना हाती घेतली. या संकल्पनेतून त्यांच्या देशभक्तीपूर्ण राईडला सुरुवात झाली होती.
कारगिलवर 1000 स्क्वेअर फुटांचा महाकाय तिरंगा
आचरेकरांनी मोहिमेदरम्यान 15 ऑगस्ट रोजी कारगिलमध्ये तब्बल 1000 स्क्वेअर फुटांचा भव्य तिरंगा फडकवला. मोहीमेत 12 स्क्वेअर फूट आकाराचा 42 तिरंगा डौलाने फडकावला गेला. यानंतर लेह, तुरतुक, पँगाँग लेक, हानले, जगातील सर्वात उंच मोटारेबल रस्ता असलेला उमलिंग आणि लामायुरू या खडतर मार्गांवरून प्रवास केला. त्यांनी या प्रत्येक ठिकाणी देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत 80 स्क्वेअर फुटांच्या तिरंग्याचे हँड होस्टिंग केलं.
डोंबिवलीच्या दहीहंडीत मोहिमेची सांगता
रायडर्सनी कारगिलमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसोबत 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला. रणरागिणींनी सीमेवरील वीर जवानांच्या मनगटावर राखी बांधली. या खडतर हवामान आणि आव्हानात्मक रस्ते पार करून हा संपूर्ण देशभक्तीचा प्रवास यशस्वी केला. आज दहीहंडीच्या दिवशी डोंबिवलीत पोहोचले. त्यानंतर डोंबिवलीत दहीहंडी उत्सवाच्या दिवशी या प्रवासाची सांगता झाली आहे. या धाडसी डोंबिवलीकरांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
