पहिल्याच पावसाने मुंबई पाठोपाठ ठाण्यालाही छळलं, लोकल सेवा ठप्प, इमारतीच्या संरक्षण भिंत कोसळल्या, जनजीवन विस्कळीत

| Updated on: Jun 09, 2021 | 6:47 PM

ठाण्यात अनेक भागांमध्ये पाणी साचलं. एका सोसायटीत तर संरक्षण भिंत कोसळल्याची घटना समोर आलीय. पावसामुळे लोकल ट्रेन सेवादेखील अनेक तास ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं (Heavy rain in Thane).

पहिल्याच पावसाने मुंबई पाठोपाठ ठाण्यालाही छळलं, लोकल सेवा ठप्प, इमारतीच्या संरक्षण भिंत कोसळल्या, जनजीवन विस्कळीत
Follow us on

ठाणे : मुंबईसह ठाण्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाचा कहर बघायला मिळतोय. मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अगदी तशीच अवस्था ठाण्यातही बघायला मिळतेय. ठाण्यात अनेक भागांमध्ये पाणी साचलं. एका सोसायटीत तर संरक्षण भिंत कोसळल्याची घटना समोर आलीय. पावसामुळे लोकल ट्रेन सेवादेखील अनेक तास ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं (Heavy rain in Thane).

रेल्वे वाहतूक ठप्प

मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलेला आहे. माटुंगा-सायन-कुर्ला या दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने, रेल्वे वाहतूक सकाळी दहा वाजल्यापासून जवळपास पाच तास ठप्प होती. रेल्वे वाहतूक ठाणे ते सीएसटी दरम्यान ठप्प झालेली होती. त्याचबरोबर पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना देखील त्याचा फटका बसला. रेल्वे स्टेशनला आलेले प्रवासी मिळेल त्या वाहनाने आपल्या घरी परतले. सुदैवाने ठाणे ते कर्जत कसारा दरम्यान लोकल लोकल सुरू होती. पहिल्याच पावसाने रेल्वे सेवा ठप्प झाल्याने रेल्वे प्रशासनावर नागरिकांनी खापर फोडले (Heavy rain in Thane).

वंदना एसटी डेपोत गुडघाभर पाणी

मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक सखल भागात पाणी साचले. ठाण्यातील वंदना एसटी डेपो याठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे अनेक वाहने अडकून पडली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुकानदारांना देखील याचा फटका बसला आहे. त्याचबरोबर वाहनांना देखील मोठा फटका बसला आहे

ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी

मुसळधार पावसामुळे ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ठाणेकरांना पाण्यातून कशीबशी वाट काढावी लागत आहे. तसेच दुचाकी गाड्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. वाहनधारक अक्षरशः दुचाकी पाण्यातून ढकलत आपली वाट काढत आहे. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाई काम सुरू असल्याचे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले. मात्र कुठेही पूर्णपणे नालेसफाई न झाल्यामुळे नाले, गटार तुडूंब भरून वाहत आहेत. त्याचा फटका दुकानदारांना देखील बसला आहे.

सोसयटीतील इमारतीची भिंत कोसळली

ठाण्यातील मनोरमानगर येथील सुकुर गार्डन स्वामी समर्थ पेज वन या इमारतीची सुरक्षा भिंत पडल्याने तीन ते चार गाड्यांचा नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण भिंतीजवळ उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं.

अंबरनाथमध्ये संरक्षण भिंत कोसळली

ठाणे जिल्ह्यातील औरंगाबाद शहरातही एका इमारतीची संरक्षण भिंत कोसळल्याचं समोर आलं आहे. अंबरनाथ शहरात पावसामुळे शिवालिक नफर सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळची भिंत शेजारी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कोसळली. या सोसायटीच्या मेन गेट समोरच खड्डा खोदून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलीये. त्यामुळे या भिंतीला आधार राहिला नव्हता. त्यातच आजच्या पावसामुळे भिंतीखालची माती खचून संपूर्ण भिंतच खड्ड्यात पडली. या ठिकाणी अनेक लहान मुलांचा वावर असतो. त्यामुळे आता सोसायटीने आणि शेजारील बांधकाम करणाऱ्या बिल्डरने सुरक्षात्मक उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडून नालेसफाईची पाहणी

ठाण्यात पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झालं. गटार-नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं. दरम्यान, पावसाचा अंदाज पाहून महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी सकाळी 11 वाजता शहरातील नालेसफाई तसेच पाणी साचणाऱ्या अनेक ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. विपिन शर्मा यांनी ठाण्यातील पातलीपाडा येथून मुसळधार पावसात नालेसफाई तसेच पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी केली.

संबंधित बातम्या :

अंबरनाथमध्ये पहिलाच पाऊस, शेकडो जखमा, कुठे भिंत कोसळली, तर कुठे नाल्याचं पाणी सोसायटीत शिरलं