शरद पवार यांचं राजकारण कसं?, मनसे आमदार राजू पाटील यांनी दोन शब्दात लावला निक्काल

| Updated on: Aug 11, 2023 | 9:47 AM

गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावरही राजू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शरद पवार यांचं राजकारण कसं?, मनसे आमदार राजू पाटील यांनी दोन शब्दात लावला निक्काल
raju patil
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे | 11 ऑगस्ट 2023 : प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे. त्यानुसार सर्वांचं राजकारण चालतं. पण राष्ट्रवादीचं बघाल तर अजितदादा कोणत्याही स्टेजवर जातात. अर्थात ते सत्तेत आहेत. अजितदादा भाजपसोबत आहेत. सुप्रिया सुळे भाजपविरोधात भांडतात हा थोडा घोळच आहे. अधिवेशन झालं तरी शरद पवार गटाकडे किती आमदार आहेत आणि अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत हे कळलंच नाही. म्हणजे एनसीपीचे सत्तेतील आमदार किती आणि विरोधी पक्षातील आमदार किती हे समजलेच नाही. हेच शरद पवार यांचे राजकारण आहे, अशी चौफेर टोलेबाजी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली.

राजू पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं समर्थनही केलं. राहुल गांधी याचं भाषण मी पाहत होतो. भाषण संपल्यावर राहुल यांनी हातवारे केले. मला वाटत नाही तो फ्लाईंग किस होता. मणिपूरमधील महिलांच्या अत्याचाराचा विषय सुरू होता. हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी भाजपच्या महिला खासदारांनी केलेला हा गलिच्छ आरोप होता, हे माझं वैयक्तिक मत आहे, असं राजू पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

या गोष्टी खपवून घेता कामा नये

यावेळी त्यांनी पत्रकाराला झालेल्या मारहाणीचाही निषेध नोंदवला. पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार पोलीस यंत्रणांचा गैरवापर करत पक्षप्रवेशाचा क्रायटेरिया बनवला जात आहे. या गोष्टी होत असताना पक्षावर टीका केली तर कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे. सोशल मीडियावर एखाद दुसरा कार्यकर्ता बोलत असेल तर मारहाण केली जात आहे. आता पत्रकारांवरही हीच वेळ आली आहे. ही गंभीर बाब आहे. पत्रकारांनी सुद्धा या गोष्टींचा निषेध नोंदवला पाहिजे. कोणताही पक्ष असो, अशा गोष्टी खपवून घेता कामा नये, असं राजू पाटील म्हणाले.

स्मारक राज यांच्या व्हिजनने व्हावं

गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्वीच्या भाषणाच्या काही क्लिप्स आहेत. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी त्या संग्रहित करून ठेवल्या आहेत. अशी देखील माहिती मिळते की राज यांनी तो संग्रह उद्धव यांना दिला होता. माझी अशी मागणी आहे की, बाळासाहेबांचे स्मारक खरोखरच चांगले करायचे असेल तर राज यांच्या व्हिजनने आणि विचारांनी व्हायला पाहिजे, असं ते म्हणाले.

राज्यातील बाळासाहेबांच्या नावाचे पहिले स्मारक नाशिकमध्ये आहे. तेथे शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. तेव्हा देखोल राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मारक असे असले पाहिजे की त्यातून शस्त्र बाहेर आली पाहिजे, असं म्हटलं होतं. याच प्रकारे बाळासाहेबांची भाषणं कशी होती, भाषण शैली कशी होती? हे या संग्रहात आलं पाहिजे. ते राज यांच्याशिवाय दुसरं कोणी बनवू शकत नाही. त्यांचा विचार घ्यायला हरकत नाही, असंही ते म्हणाले.