
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी 2025-26 चा अर्थसंकल्प मांडला. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अनुदानातत वाढ करण्यात आलेली नाही. शेतकरी सन्मान योजनेच्या निधीतही वाढ झालेली नसताना उत्पन्न वाढविण्यासाठी वाहनांवर करवाढ लादण्यात आली. या अर्थसंकल्पाचं सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी स्वागत केलं. मात्र राज्याच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका विरोधकांनी केली. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात वाढ झाली असून मंगळवारी उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून चंद्रपूर जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी 12 आणि 13 मार्च या दोन दिवसाकरिता उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) वर लादलेले निलंबन मागे घेतले. या निर्णयानंतर देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. 2019 मध्ये न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत केजरीवाल, माजी आप आमदार गुलाब सिंग आणि माजी द्वारका नगरसेवक नीतिका शर्मा यांनी दिल्लीतील विविध ठिकाणी मोठे होर्डिंग्ज लावून सार्वजनिक पैशाचा जाणूनबुजून गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीत या सर्व लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
भाजप आणि काँग्रेस आमदारांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर ओडिशा विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस आमदार तारा बहिणीपती यांना असंसदीय वर्तनासाठी ७ दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमधील पितळ आणि तांब्याच्या भांड्यांमध्ये पवित्र संगम जल आणि बिहारच्या सुपरफूड ‘मखाना’ मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांना भेट दिले.
राज्य सरकारमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे, निधीमध्ये थोडे वर खाली झाल्यासारखं वाटतंय पण काही अडचण नाही असे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
नवीन महाबळेश्वर हवं हे सगळ्यांची इच्छा होती मात्र यामध्ये केवळ एकनाथ शिंदे यांच्या प्रकल्पाला कुठेतरी विरोध करायचा म्हणून आदित्य ठाकरे यांनी अशा आशयाचं पत्र पंकजाताई यांना दिले आहे, हे योग्य नाही असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
डोंबिवली आर एस एसच्या शिबिरावर दगडफेक प्रकरणातील आरोपीला दोन दिवसांची कोठडी दिली आहे. दगडफेक करणारा 24 वर्षीय रिजवान सय्यदला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयुर्वेदिक उपचार केंद्रांवरील महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी घातल्या बेड्या घातल्या आहे. आरोपी रोहित वाघमारे, शुभम धनवटे, राहुल वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली आरएसएसच्या शिबिरावर दगडफेक प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दगडफेक करणारा 24 वर्षीय आरोपीला कल्याण न्यायालयात आणले आहे. रिजवान सय्यद असे या आरोपीचे नाव आहे. इतर चार आरोपी अल्पवयीन आहेत.
आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. ‘धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढे आहारी गेले होते की, त्यामुळे त्यांचं कुटुंब देखील त्यांच्यावर नाराज असेल, त्यांची आई तर गेल्या दीड वर्षांपासून मुळ गावी नाथ्रा येथे गेल्या आहेत, त्या अजून आल्या नाहीत’ असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. त्यावर आता धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे. आमच्या कुटुंबाची बदनामी सुरु आहे. कारण नसताना धनंजय मुंडेंना बदनाम केले जात आहे. धनंजय मुंडे यांच्या घराचे काम सुरु आहे म्हणून आई गावच्या घरी आहेत’ असे ते म्हणाले.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनवीन खुलासे होत असताना आता त्यांच्या भावाने प्रतिक्रिया दिली. धनंजय देशमुख म्हणाले की, ‘मुख्य सूत्रधाराला पाठबळ देणाऱ्यांना बाहेर काढण्याचा तांदळेंचा कट. तसेच न्यायासाठी लढणाऱ्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.’
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सर्पक्षीय नेत्यांनी , सामाजिक संघटनांनी तसेच सरपंचांनी चिखली बंदची हाक दिली आहे. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी आणि सर्व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून सकाळपासून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यावेळी सर्पक्षीय नेत्यांनी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली असून जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गडचिरोलीमधील कावंडे पोलीस स्टेशन हद्दीतील चार नक्षलवाद्यांची स्मारकं पोलिसांकडून उद्धवस्त करण्यात आली आहेत. छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलवाघांनी मोठमोठे चार नक्षल स्मारके उभारली होती.नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीनंतर 48 तासांत चार स्मारक पोलीस पथकाने उद्ध्वस्त केली आहेत. नक्षलवाद्यांचा गड असलेल्या कावंडे परिसरात जवळपास सहा पोलीस तुकड्या चार दिवसापासून कोम्बिंग ऑपरेशनवर आहेत. नक्षलवाद्यांच्या विरोधात गडचिरोली पोलीस पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आली आहेत.
धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत विधानसभेत चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद ठेवलेच पाहिजे असं स्पष्ट मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे. तसेच “सरसकट भोंग्यांची परवानगी कोणालाही देणार नाही. सर्वांना भोंग्यांच्या आवाज मर्यादेचं पालन करावच लागेल. निश्चित काळासाठी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार आहे. भोंग्यांच्या आवाजाच्या परवानगीची तपासणी करण्याची जबाबदारी पीआयची असेल” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नशिराबाद गावाजवळ पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर रात्री झोपलेले असताना या तिघांना वाहनाने चिरडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटना घडल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आहेत.
कल्याण खडकपाडा परिसरात निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील पार्किंगचा स्लॅब कोसळला. पार्किंगच्या स्लॅबचे काम सुरू असताना घडली घटना. थारवानी मॅजेस्टिक टॉवर या इमारतीचे सुरू आहे काम. चार ते पाच मजूर जखमी.जखमींना मनसे कार्यकर्त्यानी काढले बाहेर. जखमींवरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू तर खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल.
प्रशांत कोरटकरला आज मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत तसच राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय घ्यावा असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
सीकेपी समाज आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. साहित्यिक राम गणेश गडकरी यांची माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन सोडण्याचा सीकेपी समाजाने इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन करणार असल्याचा संकल्प राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे…ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो त्या राजांसाठी काहीतरी केले पाहिजे, यात राजकारण नसून प्रत्येक रविवारी गडकिल्ल्याची साफ सफाई करायची आहे, असे ते म्हणाले.
इचलकरंजी पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहन करणाऱ्या युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. पत्नीने दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. शेखर गायकवाड असं मृत युवकाचे नाव आहे. प्रकरणात पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासता यावा यासाठी सरकारने इतिहास संशोधकांच्या अध्यक्षतेखाली १४ मे २०२५ जयंतीदिनानिमित्त चरित्र साधन समिती गठीत करावी. आणि संभाजी महाराजांचे तैलचित्र विधान भवन व मंत्रालयात लावावे, यासह इतर महत्त्वपूर्ण मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केल्या आहेत.
विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी तसेच श्री विठ्ठलाच्या मूर्तीला इपॉक्सिलेप देण्यासाठी मंदिर आठ दिवस भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय होणार
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. महायुतीची जनतेशी गद्दारी, अशी घोषमाबाजी मविआचे नेते करत आहेत.
इचलकरंजी – पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहन करणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू. पत्नीने दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. शेखर गायकवाड असं मृत युवकाचे नाव असून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील आवारात चार दिवसांपूर्वी दुर्दैवी घटना घडली.
औरंगजेबाची कबर काढून टाका, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली मागणी.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी प्रशांत कोरटकर मुंबईत दाखल झाला आहे. कोर्टात हजर राहण्यासाठी कोरटकरला नोटीस बजावण्यात आली होती.
सतीश भोसलेने टकपूर्व जामीनासाठी बीड कोर्टात धाव घेतली आहे. जामीन न मिळाल्यास सतीश भोसले सरेंडर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कसब्यातील वक्फ बोर्डाच्या जागेचा कोर्टाने लिलाव केला होता. ती जागा आम्ही कर्ज काढून घेतलेली आहे. आम्हाला कुठेही वाटत नाही की आम्ही चुकीचं काम केलंय. कोणत्याही त्रासाला घाबरून कंटाळून, घाबरून मी पक्ष बदललेला नाही असं रविंद्र धंगेकरांनी स्पष्ट केलं.
संपत्तीच्या वादावरून भावाने पोलिसांसमोरच भर रस्त्यात बहिणीवर बंदूक उगारली. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद गावातील धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त आर्मी जवानाचा हा कारनामा समोर आला आहे. संपत्तीच्या वादातून मागील काही दिवसांपासून बहीण भावात वाद सुरू होता.
ठाणे पालिकेकडे शाडूच्या मूर्तीसाठी केवळ 15 अर्ज.. पालिकेच्या पीओपी बंदीला ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे… पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने मंडळाची घेतली होती बैठक…
धंगेकरांच्या पत्नीबाबत अटकेची टांगती तलवार तयार करण्यात आली… पत्नीला अटक होईल अशी भीती वाटल्यामुळे ते शिंदे गटात गेले… धंगेकरांना फोडलं तसं वायकरांना फोडण्यात आलं… धंगेकर लोकसभेला उभे राहिले तेव्हापासून त्यांची कोंडी करण्यात आली… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
उन्हाळ्यातील सुट्टीत प्रवाशांची संख्या लक्षात घेता अडीच लाख किलोमीटर बसफेऱ्या धावण्याबाबत नियोजन केले जाणार आहे… दररोज साधारण २ हजार बसफेऱ्या धावण्याचे नियोजन एसटी विभागाचे असणार आहे… नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर आदी मार्गावरील गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे…
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद गावातील धक्कादायक घटना… सेवानिवृत्त आर्मी जवानाचं कारणामा…. संपत्तीच्या वादातून मागील काही दिवसांपासून बहीण भावात सुरू होता वाद..
मावळ तालुक्यात आढले बुद्रुक येथे अग्रीस्टॅक शेतकऱ्याचे फार्मर आयडी बनविण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅम्पला कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यासाठी सात-बारा आधारकार्ड कार्डला लिंक करणे शेतीच्या दृष्टीने फायद्याचे आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावेत असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. आढले बुद्रुक गावात शेतकऱ्यांनी ह्या योजनाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
नाशिक – भर रस्त्यात खून करणारी टोळी 48 तासांच्या आत जेरबंद झाली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ मार्च रोजी खुनाची घटना घडली होती. सतरा वर्षीय अरुण मंडी या तरुणाचा खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. बेसबॉलचा दांडा, कोयता, रॉड, लोखंडी शिकंजा आणि दगडाने मारहाण करत हत्या करण्यात आली होती. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संत कबीर नगर येथे दोन अल्पवयीन बालकांची चौघांनी हत्या केली होती.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले असून आज संपूर्ण चिखली शहर बंद राहणार आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज चिखली येथे बंद पाळण्यात येणार आहे.
ठाणे- रंगपंचमीला टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय ठाणे पालिका प्रशासनाने घेतला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. पालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसेच गृह संकलनात पाणी जपून वापरण्याची वेळ येणार आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.
ठाणे- पीओपीसाठी गणेश मंडळं ठाम असून ठाणे पालिकेकडे शाडूच्या मूर्तीसाठी केवळ 15 अर्ज आले आहेत. पालिकेच्या पीओपी बंदीला ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने मंडळांची बैठक घेतली होती.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज हायकोर्टात हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात कोल्हापूर पोलीस हायकोर्टात गेली होती.
नाशिक- दुसऱ्या टप्प्यात 48 शेतकऱ्यांना 27 लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. चुकीच्या रासायनिक औषधाची फवारणी केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातील 84 शेतकऱ्यांना 62 लाखांची नुकसान भरपाई मिळाली होती. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, निफाड, येवला, सिन्नर या परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी तननाशक फवारणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातला कांदा जळाला होता.
पंढरपूर- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी तसंच श्री विठ्ठलाच्या मूर्तीला इपॉक्सिलेप देण्यासाठी मंदिर आठ दिवस भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय होणार आहे. 19 मार्च ते 25 मार् च्या दरम्यान श्री विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मंदिर बंद काळात श्री विठ्ठल मूर्तीला ईपॉक्सी लेप देण्याची शक्यता आहे
नाशिकमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तापमानाचा पारा चाळीशी गाठण्याची शक्यता आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमान 35 अंशावर पोहोचला आहे. आकाश कोरडे आणि निरभ्र असल्याने सोमवारपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. आगामी पाच दिवस उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार असल्याचा अंदाज आहे.
कल्याण-टिटवाळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. गावगुंडांकडून विवाहितेचा विनयभंग करत भररस्त्यात नग्न करण्याचा प्रयत्न झाला. तर वाचवण्यास आलेल्या पतीलाही बेदम मारहाण करत “या भागात राहायचं असल्यास तुझी बायको आमच्याकडे पाठव” अशी धमकी गुंडांनी पतीला दिली. ही घटना समोर आल्यानंतरही पोलिसांनी कठोर कारवाई न करता फक्त एनसी दाखल करून कुटुंबाला घरी जाण्याचा सल्ला दिला. स्थानिक पोलीस ठाण्यातून न्याय न मिळाल्याने पीडित कुटुंबाने गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.