मोठी बातमी! मनसेच्या उमेदवारांचं निवडणुकीपूर्वीच अपहरण? मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत असून ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे उमेदवार गायब झाले आहेत, त्यांचं अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! मनसेच्या उमेदवारांचं निवडणुकीपूर्वीच अपहरण? मोठी खळबळ
मनसेच्या उमेदवारांच्या अपहरणाचा संशय
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 01, 2026 | 4:29 PM

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराने देखील वेग घेतला आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता कोण-कोणाच्या बाजुनं लढणार आणि कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट देण्यात आलं आहे? याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यातच आता अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे.  अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत, त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत. गेल्या चोवीस तासांपासून या  उमेदवारांचा कुटुंबाशी कोणताच संपर्क झाला नसल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष  सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिली आहे. केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठीच दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नाव आहेत.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार गायब झालेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार हा भारतीय जनता पार्टी तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभा होता. दरम्यान या प्रकरणी आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून,  लवकरात लवकर गायब असलेल्या उमेदवारांचा तपास करावा अशी मागणी केली आहे.

मनसे -ठाकरे गट युती 

दरम्यान यावेळी मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती झाली आहे. तब्बल 18 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती महायुतीपुढे मोठं आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.