Uddhav Thackeray : ‘तर तुमची असलीयत काढावी लागेल…’, उद्धव ठाकरे यांचे मोदी यांना खुले आव्हान
दर वेळेला काय झालं की पाकिस्तानची भीती दाखवता. तुम्ही बेकारीबद्दल का नाही बोलत. मग त्यांच आता सुरू झाले. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला नकली सांगता? काय बोलताय मोदीजी तुम्ही. आम्ही काय केले ते आम्हाला माहित आहे. पण, तुमची असलीयत काय आहे ती ही आम्हाला काढावी लागेल.

मुंबई : दूर गाव मे बच्चा होता है वो सोता नही तो कहते है, गब्बर आ जायेगा. सध्या देशातली जनता मोदींना सांगते की, आम्हाला भूक लागली. आम्हाला अन्न पाहिजे. आम्हाला नोकऱ्या पाहिजे. आम्हाला सुरक्षा पाहिजे. पण, मोदी सांगतात, गप्प बसा नाही तर मुसलमान येतील. या दहा वर्षांमध्ये तुम्हाला हा सलोखा करता आला नाही. दर वेळेला काय झालं की पाकिस्तानची भीती दाखवता. तुम्ही बेकारीबद्दल का नाही बोलत. मग त्यांच आता सुरू झाले. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला नकली सांगता? काय बोलताय मोदीजी तुम्ही. आम्ही काय केले ते आम्हाला माहित आहे. पण, तुमची असलीयत काय आहे ती ही आम्हाला काढावी लागेल, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
महाविकास आघाडीची सभा बांद्रा येथील बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. हुकूमशहा याची नजर कशी असते? राक्षसी? अरे! पंतप्रधान म्हणून शेतकरी तुमच्याकडे कांद्याचा हमी भाव मागतोय. कांद्याला भाव मागतोय. निर्यात बंदी मागतोय. त्यांचे न ऐकता तुम्ही भारत माता की जय! भारत माता की जय! म्हणता. मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे तरी कुठे आहे? कांदा उत्पादक शेतकरी हा सुद्धा भारत माताचा आहे. मणिपूरमध्ये ज्यांचे धिंडवडे काढले गेले त्या महिला सुद्धा भारत माताच आहेत की नाही असा सवाल त्यांनी केला.
देश म्हणजे देशातली माणसं आहेत. देश म्हणजे देशातले दगड धोंडे नाहीत. निवडणूक आल्यानंतर हिंदू, मुसलमान सुचते. हिंदू, मुसलमान सगळेच ठाकरेंच्या बरोबर आहेत. माझं बालपण सगळीकडे मुस्लिम कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत गेलं आहे. ज्या दिवशी आमच्या घरी स्वयंपाक होत नव्हता त्यावेळी मुस्लिम कुटुंबीयांकडून आमच्या घरामध्ये जेवण येत होतं. मी माझ्या सगळ्या मुंबईकरांसमोर तुम्हाला आव्हान देतोय. चला एका व्यासपीठावर येऊ या. माझी सात पिढ्यांची वंशावळ ठेवतो. मोदीजी तुमची असेल तर तुम्ही ठेवा. तुमच्या सात पिढ्याने देशासाठी काय केले ते सांगा आणि माझ्या ठाकरे घराण्याच्या पिढ्यांनी काय केले हे मी तुम्हाला सांगतो असे खुले आव्हान त्यांनी मोदी यांना दिले.
अमित शहा म्हणतात, मोदी यांना तिसऱ्या वेळेला पंतप्रधान करायचं. जो कोणी गोंधळ करेल त्याला उलटा टांगून आम्ही सरळ करू. म्हणजे काय? मला कळलं नाही. नेमकं काय करणार आहेत. इकडे तुरुंगात गेलो तरी चालेल पण मोदीसमोर झुकणार नाही असे म्हणणारे अरविंद केजरीवाल आपल्यासोबत आले आहेत. मोदीजी इकडे सगळे मुंबईकर आहेत. हे मुंबईकर जेव्हा संकटात असतात तेव्हा त्यांना मदत करायला घेऊन जातो तो शिवसैनिक जातो भाजपचा कार्यकर्ता नाही जात कुठे? अशी टीका त्यांनी केली.
कुठे आग लागली शिवसैनिक जातो. तो वाचवणाऱ्याला विचारत नाही तू कोण आहेस? मुसलमान आहेस, मराठी आहेस, उत्तर भारतीय आहे? तुमचे जे पूर्वज होते त्यांनी मराठी माणसांना गोळ्या घातल्या होत्या. म्हणून एकशे पाच हुतात्मे झाले होते. संघर्ष करून रक्त सांडून ही मुंबई आम्ही मिळवलेली आहे. मोरारजी म्हणत होते मराठी माणसाला इकडे प्रवेश देणार नाही. आम्ही गुजराती लोकांविरुद्ध नाही. पण, गुजरातमध्ये मराठी माणसाला प्रवेश दिला नाही तर आमचे दरवाजेही बंद करून तुम्हाला गुजरातला पाठविल्याशिवाय राहणार नाही. आम्ही इकडे मराठी, गुजराती, हिंदी सगळे एकत्र राहतो असे ते म्हणाले.
कोरोन काळात काय केले यांनी? महाविकास आघाडीचे सरकार होते. स्वतः अमित शहा आणि मोदी यांना फोन करून सांगत होतो की माझ्याकडे राहणारे उत्तर भारतीय गावी जाऊ इच्छितात त्यांना घरी जाऊ द्या. मी पैसे देतो. सरकार पैसे देईल. पण त्यांनी नाही नाही म्हणत नकार दिला. मी त्यांना म्हटले की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. काही जण गेले. त्यांना जिथे जिथे थांबवेले तिथे त्यांच्या छावण्या उभ्या केल्या, पण यांनी काहीच केले नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
