त्यांना बुद्धीच नाही… उद्धव ठाकरे यांचा परभणीच्या सभेतून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्लाबोल

| Updated on: Apr 23, 2024 | 8:33 PM

परभणीकरांना मनापासून साष्टांग दंडवत घालतो. परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. दोन मावळे माझ्या उजव्या डाव्या बाजूला आहेत. भाजप आणि मिंधेंना वाटलं असेल सर्व काही पैशाने खरेदी केलं जाऊ शकतं. पण परभणीकर पैशाने विकले जाणार नाहीत. ही आपली परीक्षा आहे. वादळाला अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठिवर वार करत नाही. आम्ही वादळाच्या छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत, असा हल्लाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चढवला.

त्यांना बुद्धीच नाही... उद्धव ठाकरे यांचा परभणीच्या सभेतून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्लाबोल
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सुधीर मुनगंटीवार हा विकृत बुद्धीचा नेता आहे. त्यांना बुद्धी नाही. मोदींच्या सभेत ते बहीण भावाच्या नात्याबद्दल बोलले. त्यामुळे मानखाली घालायला लागली. मोदीजी त्यावर बोला ना? तुम्ही शिवसेनेला नकली शिवसेना म्हणता ना? पण त्या टिनपाटांना आवर घालत नाहीत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. इथला एक मंत्री सुप्रिया सुळेंबद्दल बोलला. त्यावर मोदी आणि शाह काहीच बोलले नाही. त्यामुळे या लोकांना मते देऊ नका, असं आवाहनच त्यांनी केलं.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज परभणीत होते. परभणीत प्रचारसभेत भाषण करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या मशाल गीतावर आक्षेप घेतला आहे. आयोगाने मशाल गीतातील जय भवानी शब्द काढायला सांगितला आहे. या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. आपलं मशाल गीत ऐकलं तुम्ही? त्यात जय भवानी, जय शिवाजी शब्द आहे. त्या गाण्यातल्या या शब्दांना मोदी आणि शाहांचा नोकर असलेल्या निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्याने सांगितलं जय भवानी शब्द काढा. मी मोदी-शाह यांना सांगेल, तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी म्हणाल्या लावल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

जय भवानीबद्दल एवढा आकस का?

तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचा आहे ना? बघा प्रयत्न करून. माझ्यासोबत मर्द मावळे आहेत. आम्ही बजरंग बली की जय बोलतो. पण तुमच्या मनात जय भवानी शब्दाबद्दल एवढा आकस का आहे? दिल्लीत बसले म्हणजे ते म्हणतील ते देश ऐकेल? ही गुरंढोरं नाही, ही माणसं आहेत. तुम्ही पाठीत वार केला म्हणून ही माझी वाघनखं बाहेर आली आहेत. आम्ही मुनगंटीवारांसारखी शोबाजी करत नाही, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

त्या संकटाला चिरडलं, हे संकटं कोणतं?

उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असतनाच पावसाचं आगमन झालं. हा मुद्दा पकडून उद्धव ठाकरे यांनी धुवांधार बॅटिंग केली. मी वादळात उभा राहणार आहे. तुम्ही राहणार की नाही? मी संकटाशी झुंज देणार आहे. तुम्ही देणार की नाही? अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे. तुम्ही भिजणार की नाही? मग जागेवर बसून घ्या. मी नाही हटणार. मी उभा राहिलो आहे लढायला. येऊ दे संकट किती यायचं तेवढं. आम्ही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मर्द मावळे आहोत. त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलंय, तर हे संकट कोणतं?, असा सवाल त्यांनी केला.