मराठेशाहीचा चालता-बोलता इतिहास हरपला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. मराठा इतिहास आणि राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्रावर त्यांनी केलेले कार्य अजरामर राहील.

मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि राजर्षी शाहू विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शेतकरी कुटुंबातून इतिहास संशोधनापर्यंतचा प्रवास
डॉ. जगसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, मात्र उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आले आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १९६४ मध्ये त्यांच्या संशोधन कारकिर्दीला सुरुवात झाली. एम.ए. परीक्षेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला होता.
संशोधन आणि ग्रंथसंपदा
डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकला. विशेषतः छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर त्यांनी सखोल संशोधन केले. त्यांनी २५ पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले असून, त्यात ‘मराठ्यांचा इतिहास’, ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ आणि करवीर संस्थापिका ताराबाईंचे चरित्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ‘पंचगंगा तिरी’ हे त्यांचे आत्मचरित्रही विशेष गाजले.
डॉ. पवार यांना खऱ्या अर्थाने शाहूचरित्रकार म्हणून ओळखले जाते. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि विचार जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांनी संपादित केलेला १२०० पानांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ हा इतिहास संशोधनातील एक मैलाचा दगड ठरला आहे. या ग्रंथाचे विविध भारतीय आणि परकीय भाषांमध्ये अनुवाद करण्याचे मोठे काम त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून केले.
पुरस्कार आणि सन्मान
इतिहास संशोधनातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना २१ हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची डोळस दृष्टी देणारा हा महान संशोधक आता आपल्यात नसला, तरी त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि विचार पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरतील.
