नरेंद्र दराडेंचं टेन्शन वाढलं, उदय सामंत तातडीनं मुंबईला रवाना, महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, मात्र गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढलं आहे.

नरेंद्र दराडेंचं टेन्शन वाढलं, उदय सामंत तातडीनं मुंबईला रवाना, महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग
uday samant
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 8:00 PM

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं होतं. इच्छा असूनही ज्यांना तिकीट मिळालं नाही, अशा अनेक इ्च्छूक उमेदवारांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु गुरुवारी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी महायुतीला ही बंडखोरी मोडून काढण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालं. मात्र नाशिकमध्ये पूर्ण ताकद लावून देखील या मतदारसंघातील बंडखोरी महायुतीला रोखता आलेली नाहीये.

महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र त्यापूर्वीच गणेश गीते यांनी भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र गुकुळ गीते अजूनही ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये. त्यामुळे आता शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी आता महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये बैठक होणार होती, मात्र ही बैठक झालेली नाहीये, महाजन यांची भेट न घेताच उदय सामंत हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.  त्यामुळे आता गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे  गोकुळ गीते ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे यावरून महायुतीमध्ये देखील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us