
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीतही भाजप आणि महायुती शानदार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 12 पैकी 8 जागांवर आता भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष असणार आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही शानदार कामगिरी केली आहे. या निवडणुकीतील यशावर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. बावनकुळे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या निकालावर बोलताना म्हटले की, ‘भाजप हा महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल असे यापूर्वी बोललो होतो. महानगरपालिका प्रमाणेच जिल्हा परिषदेत सुद्धा जवळपास आठ जागेवर भाजपचे अध्यक्ष असतील. डबल इंजन सरकार जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जिल्हा परिषदेतही नवीन विकसित ग्रामीण महाराष्ट्र या माध्यमातून कामे होणार आहे. हे जनतेपर्यंत घेऊन गेलो. निवडणूक प्रचारादरम्यान ग्रामीण जनता राज्य आणि केंद्र सरकारच्या पाठीशी उभी राहिली.
अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘पुणे जिल्हा अजित दादाच्या पाठीशी होताच. पुणे जिल्ह्याने जे मत दिलं ते अजित दादांना मिळालेला मत आहे, ते मत महायुतीलाच मिळालेलं आहे. महायुती महाराष्ट्रात येणार आहे. काही जिल्हा परिषदेवर अजितदादांचे तर काही ठिकाणी शिंदे सेनेचे तर काही जागेवर भाजपचे अध्यक्ष बसतील.
काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत दणका बसला आहे. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी खाली गेली आहे. आता टीका टिप्पणीवर महाराष्ट्र मत देत नाही, तर विकासाला मतदान करते. काँग्रेसने टीका टिप्पणी आणि निगेटिव्ह प्रचार केला. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलं. शरद पवारही महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यात कमी पडले. महाविकास आघाडीसाठी वाईट निकाल आले आहे. त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे.
काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पार्टीची भूमिका चुकत आलेले आहे. त्यांची नकारात्मक भूमिका आहे, त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन विकासाच्या योजना मांडायला पाहिजे होत्या. महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे. कारण त्यांच्याकडे कुठलेही व्हिजन नसल्यामुळे त्यांच्यासोबत जनता नाही.