जयदीप राणा आणि नीरज गुंडे नेमके कोण जे नवाब मलिकांच्या निशाण्यावर आहेत, फडणवीसांशी संबंध काय ?

| Updated on: Nov 01, 2021 | 7:03 PM

राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकेत असलेला जयदीप राणा तसेच एनसीबी ऑफिसमध्ये ये-जा असणारा नीरज गुंडे या दोघांचेही फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केलाय.

जयदीप राणा आणि नीरज गुंडे नेमके कोण जे नवाब मलिकांच्या निशाण्यावर आहेत, फडणवीसांशी संबंध काय ?
jaideep rana neeraj gunde
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकेत असलेला जयदीप राणा तसेच एनसीबी ऑफिसमध्ये ये-जा असणारा नीरज गुंडे या दोघांचेही फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केलाय. मागील काही दिवसांपासून नवाब मलिक एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. पण त्यांनी आपला मोर्चा आता फडणवीस यांच्याकडे वळवल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर जयदीप राणा तसेच नीरज गुंडे नेमके कोण आहेत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

जयदीप राणा कोण आहे ?

जयदीप राणाचा फडणीस यांच्याशी जवळचा संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर वेगवेगळे फोटो अपलोड केले आहेत.

मलिक यांच्या आरोपांनुसार…

♦ जयदीप राणा सध्या कारागृहात आहे. त्याला 2020 च्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलं होतं.

♦ फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा या राणाने फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत नदी स्वच्छता मोहिमेसाठी गाणं गायलं होतं. यामध्ये फडणवीस तसेच मुनगंटीवार यांनी अभिनयदेखील केला होता.

♦ तसेच फडणवीस आणि जयदीप राणा यांचे गणपती दर्शन घेताना सोबत फोटो आहेत, असा दावा मलिक यांनी केलाय.

♦ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या राणा याचे फडणवीस यांचे संबंध आहेत, असंही मलिक यांनी म्हटलंय.

नीरज गुंडे कोण आहे ?

जयदीप राणा तसेच नीरज गुंडे या दोघांशी फडणवीस यांचा निकटचा संबंध आहे, असा आरोप मलिक यांनी केलाय.

♦ नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा दूत होता.

♦ नीरज गुंडे हा फडणवीस यांच्या जवळचा असून त्याची एनसीबीच्या कार्यालयात सतत ये-जा असायची.

♦ पोलिसांच्या बदल्या तसेच मंत्रालयातील कामे मार्गी लावण्याचे तो काम करायचा.

♦ शिवसेना आणि भाजपत तणाव निर्माण झाल्यानंतर तो मातोश्रीवर निरोप घेऊन जायचा.

फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळले

दरम्यान, मलिक यांच्या या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मलिक यांचे सर्व आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. त्यामागची मानसिकता समजून घेतली पाहिजे. मलिक यांनी माझा फोटो ट्विट केला नाही. कारण माझ्यासोबत कोणीही फोटो काढू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे माझ्याबरोबरचा फोटो ट्विट केला असता तर आरोप फुसका ठरला असता, असे म्हणत फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

इतर बातम्या :

पाटणा गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरण, चौघांना फाशी, तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा

मुंबईत नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना, भाजपचा आरोप; गांधीगिरी आंदोलनातून निषेध

‘इंधन दरवाढीकडे लक्ष जाऊ नये म्हणून आर्यन खाच्या बातम्यांवर जोर’, सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार

(who are jaideep rana and neeraj gunde how they are connected with devendra fadnavis know all about nawab malik allegations)