सरकारी शिष्टमंडळ भेटल्यानंतर उपोषण मागे घेणार का? मनोज जरांगे म्हणाले…

सरकारी शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर ३० मे रोजी होणारे उपोषण मागे घेतले जाणार का? यावर स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली असून सरकारला थेट इशारा दिला आहे.

सरकारी शिष्टमंडळ भेटल्यानंतर उपोषण मागे घेणार का? मनोज जरांगे म्हणाले...
Manoj Jarange Patil
| Updated on: May 29, 2026 | 10:40 AM

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या (३० मे) पासून भर उन्हात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे दुपारी भेट घेणार आहे. या भेटीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उपोषणामुळे माझे प्रचंड हाल होत आहेत, पोटात आग होत आहे आणि खूप त्रास सहन करावा लागतोय. अशा स्थितीतही मी तळपत्या उन्हात माझ्या समाजाच्या लेकरांच्या कल्याणासाठी स्वतःला भाजून घेतोय. मुख्यमंत्र्यांच्या किमान एवढं तरी लक्षात यायला हवं. इतक्या वेदना होत असतानाही सरकार या समाजाला तळमळायला लावत आहे. मराठ्यांच्या लेकराबाळांनी काय गुंता केलाय? आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या, पण माझ्या गोरगरीब मराठ्यांचे वाटोळे का करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

तुम्हाला गरिबाच्या लेकरांची हाय लागेल

तुम्हाला मराठ्यांनी भरपूर मतदान केलं म्हणूनच तुम्ही सत्तेत आलात. मग मराठ्यांवर इतका अन्याय आणि अत्याचार का? लेकरं ही लेकरं असतात. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यांमध्ये असा दुजाभाव का करताय? असं सरकार कुठे असतं का? मला सरकारची ही भूमिका अजिबात आवडलेली नाही. यामुळे गरिबांचे वाटोळे झाले आहे. उठलं सुठलं की तुमचं राजकारण, तुमच्या निवडणुका, तुमचं उमेदवारी वाटप आणि पक्ष फोडाफोडी, यातच तुम्ही खूश आहात. जनतेला तुम्ही कधी खूश करणार? तुम्हाला गरिबाच्या लेकरांची हाय लागेल, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

सरकारची भूमिका काय आहे ते कळू द्या

यानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. मला सरकारची भूमिका काय आहे ते कळू द्या, विखे पाटील आणि त्यांचे इतर जे कोणी मंत्री आहेत, त्यांनी काय अंमलबजावणी सोबत आणल्या आहेत, त्यांच्यासोबत कोण कोण येणार आहे, प्रसाद लाड यांचं काय म्हणणं आहे. मी सर्व बघतो. पण एक सांगतो की ३० तारखेचं उपोषण नक्की होणार. तेही कठोर आणि कडक होणार आहे या देशाच्या पाठीवर कधीही घडलं नसे तर ते या आंतरवालीत होणार आहे. तेही गरिबाच्या लेकराच्या कल्याणासाठी होणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us