नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?
Namaz Ban : पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी भारतात नमाजवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे.

भारतात मुस्लिम धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत. देशात अनेक ठिकाणी मशीदी आहेत, या ठिकाणी नमाज पठण केले जाते. अशातच आता उत्तर प्रदेशातील अयोध्येतील आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले तपस्वी छावणी पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी भारतात नमाजवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले जगद्गुरू परमहंस आचार्य?
नमाजवर बंधी घालण्याची मागणी करताना जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी सांगितले की, ‘आम्ही महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून भारतात नमाजवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. कारण इस्लाम ही अशी उपासना पद्धती आहे जी इतर उपासना पद्धतींना गिळंकृत करते. याची उदाहरणे म्हणजे 16 ऑगस्ट 1946 चा डायरेक्ट अॅक्शन डे, 1990 मधील काश्मीरमधील हिंदूंचे हत्याकांड आणि अलीकडेच मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण यांना नमाजी म्हटले. प्रत्यक्षात पैगंबर मोहम्मद यांच्या आधी पृथ्वीवर कोणताही मुस्लीम नव्हता.’
मौलाना जर्जिस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत मौलाना जर्जिस अन्सारी यांनी केलेल्या विधानावर बोलताना जगद्गुरू परमहंस आचार्य म्हणाले की, ‘आज आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवले आहे. मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण मुस्लीम होते आणि ते दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत होते, असे वक्तव्य केले. जर एखाद्या सनातनी व्यक्तीने अल्लाहबद्दल अशाच प्रकारचे विधान केले असते, तर केवळ भारतातच नव्हे तर 57 इस्लामी देशांमध्येही मोठा गदारोळ झाला असता, हिंसाचार झाला असता आणि अनेकजण रस्त्यावर उतरले असते.’
पुढे बोलताना आचार्य यांनी सांगितले की, ‘हिंदू देवी-देवतांबाबत सातत्याने आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. तसेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्यापार जिहाद, फिल्म जिहाद, वैद्यकीय जिहाद अशा विविध माध्यमांतून हिंदू समाजाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे राष्ट्रपतींकडे नमाजवर बंदी घालण्याची मागणी करत आहोत.’
