निशाणा चुक्याच… माकडाऐवजी बसलं माणसाला इंजेक्शन, पुढे काय झालं? यवतमाळमधील घटनेने खळबळ

Yavatmal : यवतमाळमध्ये पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या पथकाकडून एक मोठी चूक झाली. माकडाला मारलेले इंजेक्शन थेट एका व्यक्तीला लागल्याचे समोर आले आहे.

निशाणा चुक्याच... माकडाऐवजी बसलं माणसाला इंजेक्शन, पुढे काय झालं? यवतमाळमधील घटनेने खळबळ
yavatmal Monkey News
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 18, 2026 | 3:11 PM

गेल्या काही वर्षांपासून अनेक जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरू लागले आहेत. यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या पथकाकडून एक मोठी चूक झाली. माकडाला बेशुद्ध करण्यासाठी झाडलेला डार्ट (इंजेक्शन) चुकून एका नागरिकाला लागल्याचे समोर आले आहे. यानंतर त्या नागरिकाचं नेमकं काय झालं? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पिसाळलेल्या माकडाचा उच्छाद

जवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील भवानी गावात एका पिसाळलेल्या माकडाने उच्छाद मांडला होता. यामुळे अनेक नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली होती. या माकडाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या माकडाला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकही उपस्थित होते. यावेळी एक थरारक घटना घडली.

शूटरचा निशाणा चुकला अन्…

वन विभागाकडून मंगळवारी दुपारी जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. हे माकड एका ठिकाणी बसलेले असताना त्याला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाच्या शूटरने निशाणा धरला. मात्र, माकडाने अचानक हालचाल केली, त्यामुळे शूटरचा अचूक निशाणा चुकला आणि ट्रॅन्क्विलायझर गनमधून सुटलेले इंजेक्शन (डार्ट) थेट गर्दीत उभे असलेल्या सदानंद खराटे रा. डोंगरगाव (वय 45) यांना जाऊन लागले. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

जखमी सदानंद खराटे यांच्यावर उपचार सुरू

माकडाला बेशुद्ध करण्यासाठी मारलेले इंजेक्शन सदानंद खराटे यांना लागताच ते जखमी झाले. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. जखमी सदानंद खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. वनविभागाच्या या चुकीच्या कारवाईमुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us