आयुष्याचा काय भरोसा..? क्रिकेट मॅचसाठी अंपायर म्हणून गेले अन् गमावला जीव.. 65 वर्षांच्या वृद्धासोबत काय घडलं ?
उन्नावमधील शुक्लागंज येथील सप्रू मैदानावर क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात कानपूर क्रिकेट असोसिएशनचे अंपायर माणिक गुप्ता यांचा मृत्यू झाला. कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

माणसांचं आयुष्य खूप क्षणभंगुर आहे, जीवनाचा काहीच भरोसा नाही. आज हसता खेळता माणूस उद्या दिसलेच याची काही शाश्वती नाही. आणि कोणाला मृत्यू कुठे, कसा, कधी येईल हे तर सांगताच येणार नाही. असंच काहीसं उत्तर प्रदेशमध्ये घडलं. एका 65 वर्षांच्या वृद्धाचा विचित्र परिस्थितीत मृत्यू झाला. माणिक गुप्ता हे अंपायर होते, सकाळी ते एका मॅचसाठी घरातून बाहेर पडले. पण परत आलेच नाहीत. कारण क्रिकेट मॅचदरम्यानच त्यांच्यावर आणि इतर खेळाडूंवर मधमाश्यांनी हल्ला केला, त्यांना माश्यांनी डंख मारला आणि यामुळेच गुप्ता यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी उन्नाव जिल्ह्यातील शुक्लागंज येथील सप्रू मैदानावर क्रिकेट लीग सामना सुरू होता. सामन्यादरम्यान अचानक मधमाश्यांच्या झुंडीने खेळाडूंवर हल्ला केला. मधमाश्यांनी खेळाडूंसह अंपायर माणिक गुप्ता आणि जगदीश शर्मा यांना लक्ष्य केले. सुमारे १० मिनिटे मधमाश्या त्यांना डंख मारत होत्या, ज्यामध्ये पंच माणिक गुप्ता गंभीर जखमी झाले.
30 वर्षांपासून KCA शी निगडीत
गंभीर अवस्थेत, त्यांना ताबडतोब शुक्लागंजमधील खाजगी रुग्णालयात आणि नंतर कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात नेण्यात आले. तिथून डॉक्टरांनी त्यांना कार्डिओलॉजीला रेफर केले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी चार मुली आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत माणिक गुप्ता यांचे अंत्यसंस्कार होतील. माणिक गुप्ता हे फील्डखाना येथील रहिवासी होते आणि गेल्या 30 वर्षांपासून कानपूर क्रिकेट असोसिएशन (KCA) शी संबंधित होते.
अचानक मधमाश्यांचा हल्ला
शुक्लागंज येथील kCA चे अंपायर सुनील यांनी सांगितले की, सप्रू स्टेडियमवर सामन्याचा दुसरा डाव सुरू होता. मात्र अचानक, मधमाश्यांच्या झुंडीने खेळाडू आणि पंचांवर हल्ला केला. जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्ही सर्वजण पाणी पीत होतो, तेवढ्यात अचानक मधमाश्या आल्या. आम्ही सगळ्यांना लगेच जमिनीवर झोपायला सांगितलं, पण त्यानंतरही मधमाशांचा हल्ला सुरूच होता, असं सुनिल म्हणाले. या हल्ल्या, मधमाश्यांच्या डंखाने माणिक गुप्ता गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला असं त्यांनी सांगितलं.
