सावधान! आज तुमच्या मोबाईलवर वाजू शकतो मोठा सायरन, घाबरू नका, नेमकी भानगड काय वाचा

दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण २ मे रोजी देशव्यापी आपत्ती सूचना प्रणालीची चाचणी घेणार आहेत. या चाचणीदरम्यान, देशभरातील लाखो मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरन वाजू शकतात. जर तुमच्या मोबाईलवर देखील सायरन वाजला तर घाबरु नका...

सावधान! आज तुमच्या मोबाईलवर वाजू शकतो मोठा सायरन, घाबरू नका, नेमकी भानगड काय वाचा
Mobile siren
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 02, 2026 | 10:36 AM

२ मे रोजी देशभरातील कोट्यवधी मोबाईलवर एकाच वेळी मोठा सायरन वाजू शकतो. सरकार देशभरात एक नवीन मोबाईल-आधारित ‘डिझास्टर अलर्ट सिस्टम’ (आपत्ती चेतावणी प्रणाली) तपासणार आहे. दूरसंचार विभागाने नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी (NDMA) च्या सोबतीने हे मोबाईल डिझास्टर कम्युनिकेशन सिस्टम किंवा इमर्जन्सी अलर्ट सिस्टम तयार केले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांना एकाच वेळी सतर्क करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

नेमकी काय आहे भानगड?

यापूर्वी देखील दिल्ली-NCR आणि अनेक मेट्रो शहरांमध्ये या प्रणालीची चाचणी घेण्यात आली आहे. सरकारने याला ‘सचेत’ (SACHET – नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टल) असे नाव दिले आहे. सरकारने एसएमएसद्वारे (SMS) याबाबतची माहिती आधीच लोकांपर्यंत पोहोचवली आहे. NDMA द्वारे पाठवण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, “२ मे २०२६ रोजी तुमच्या भागात ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट’ची चाचणी केली जाईल. तुमच्या मोबाईलवर हा संदेश आल्यास, कोणत्याही कृतीची आवश्यकता नाही. कृपया घाबरून जाऊ नका.”

अशा परिस्थितीत म्हणजेच 2 मे रोजी तुमच्या फोनवर सायरन वाजला, तर घाबरण्याची गरज नाही. भविष्यात कोणतीही आपत्ती आल्यास लोकांपर्यंत वेळीच माहिती पोहोचवता यावी, यासाठी सरकार या अलर्ट सिस्टमची चाचणी घेणार आहे. दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) मिळून ही चाचणी करत आहेत. हे आपत्तीच्या वेळी लोकांना सावध करण्याचे काम करेल, जेणेकरून लोक सतर्क राहतील आणि जीवित व वित्तहानी कमी करता येईल.

ही यंत्रणा कशी काम करते?

DoT आणि NDMA ने विकसित केलेली ही अलर्ट सिस्टम ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’ (CAP) वर आधारित आहे. इंटरनॅशनल टेलिकॉम युनियनने सुचवलेली ही प्रणाली देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय आहे. यामध्ये वापरकर्त्यांना मोबाईलवर एसएमएसद्वारे आपत्तीशी संबंधित चेतावणी पाठवली जाते. तसेच, फोनवर एक मोठा सायरन वाजवला जातो, जेणेकरून लोक सावध होतील.

विशेष म्हणजे, ही यंत्रणा अशा प्रकारे विकसित करण्यात आली आहे की, ज्या भागात आपत्ती येणार आहे केवळ त्याच भागातील लोकांच्या मोबाईलवर हा अलर्ट येईल. यामध्ये ‘सेल ब्रॉडकास्ट’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे सर्व मोबाईल उपकरणांवर एकाच वेळी (रियल टाइममध्ये) अलर्ट प्राप्त होतो.

Follow Us