Balen Shah : बालेन शाहाचा भारताला आणखी एक मोठा झटका; अचानक तो नियम बदलला, आता नेपाळला जाणं सुद्धा अवघड

नेपाळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान झाल्यापासून सातत्याने भारताविरोधात भूमिका घेत आहेत. त्यानंतर आता त्यांनी महत्त्वाचा नियम बदलला असून, आता नेपाळमध्ये जाणं देखील अवघड झालं आहे.

Balen Shah : बालेन शाहाचा भारताला आणखी एक मोठा झटका; अचानक तो नियम बदलला, आता नेपाळला जाणं सुद्धा अवघड
Balen Shah
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 14, 2026 | 3:05 PM

काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये जेन झेडने मोठं आंदोलन केलं होतं. नेपाळमध्ये असलेल्या सरकारविरोधात तेथील जेन झेडच्या मनात प्रचंड असंतोष होता, याविरोधात जेन झेड रस्त्यावर उतरली आणि नेपाळमधील सरकार उलथून लावलं. त्यानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि बालेन शाह यांच्या पक्षाला नेपाळमध्ये प्रचंड बहुमत मिळालं. बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान झाले. मात्र बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान होताच त्यांनी आता निर्णयाचा धडका लावल्याचं पहायला मिळत आहे. एका पाठोपाठ घेतलेल्या या निर्णयामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. बालेन शाह यांनी पंतप्रधान होताच नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी शेजारील राष्ट्रांसोबत समान व्यवहार केला जाईल अशी घोषणा केली होती. तसेच भारत आणि चीनसोबत व्यवहार करताना कोणालाही झुकतं माप दिलं जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाहीये, बालेन शाह यांनी आतापर्यंत जे काही निर्णय घेतले आहेत, त्याचा मोठा फटका हा भारतालाच बसताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतामधून नेपाळामध्ये येणाऱ्या वस्तुंवर कर लावण्याची घोषणा केली होती. बालेन शाह यांच्या या निर्णयामुळे सीमावर्ती भागातील व्यापार आता संकटात सापडला आहे. 100 रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वस्तूंवर कर लावला जात आहे, त्यामुळे भारतामधून वस्तू खरेदी करून नेपाळला विक्री करणारे व्यापारी मोठ्या संकटात सापडले आहेत. नेपाळच्या सीमावर्ती भागातील व्यापाऱ्यांनी बालेन शाह यांच्याकडे तक्रार केली होती, की नेपाळमधील ग्राहक हे थेट भारतीय बाजरपेठेतून सामान खरेदी करतात, त्यामुळे आमचं नुकसान होत आहे. त्यानंतर बालेन शाह यांनी शुल्क लावण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नेपाळ सीमा शुल्क विभागाकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. आता भारतामधून नेपाळमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या चालकाला आपलं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. एवढंच नाही तर चालकांना नव्या व्यवस्थेनुसार क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या वाहनाची नोंदणी करावी लागणार आहे. तसेच अस्थायी वाहन प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया खूपच किचकट असल्यामुळे आता नेपाळला जाणं देखील अवघड झालं आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना बसत आहे. यासंदर्भात माहिती देताना एका व्यावसायिकाने सांगितलं की, नेपाळच्या या नव्या नियमांमुळे भारत आणि नेपाळमधील व्यापार पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तसेच नेपाळमध्ये भारतातून जे पर्यटक जात आहेत, त्यांच्या नोंदणीसाठी देखील आता काही जाचक नियम बनवण्यात आले आहेत, ज्याचा फटका हा  पर्यटनाला बसण्याची शक्यता आहे.

Follow Us