बिहारमध्ये शानदार विजय, आता किती राज्यांमध्ये भाजपची सत्ता? PM मोदींचे पुढील टार्गेट काय?

BJP Power States : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. बिहार निवडणूकीतील विजयासह भाजपचा भगवा आता देशातील प्रमुख राज्यांमध्ये फडकताना दिसत आहे. कोणत्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे ते जाणून घेऊयात.

बिहारमध्ये शानदार विजय, आता किती राज्यांमध्ये भाजपची सत्ता? PM मोदींचे पुढील टार्गेट काय?
BJP Power State
Updated on: Nov 14, 2025 | 10:42 PM

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. या निवडणूकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेससह इतर पक्षांना मोठा फटका बसला आहे. बिहार निवडणूकीतील विजयासह भाजपचा भगवा आता देशातील प्रमुख राज्यांमध्ये फडकताना दिसत आहे. बिहारमधील विजयानंतर आताा किती राज्यांमध्ये भाजपची सत्ता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुढील लक्ष्य काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची राज्ये भाजपच्या ताब्यात

बिहार निवडणुकीतील यशानंतर भाजप आणि एनडीए आता 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्तेत आहे. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये भाजप आणि एनडीएची सत्ता आहे. यातून हे स्पष्ट होते की देशातील महत्त्वाची राज्ये ही भाजपच्या ताब्यात आहेत.

BJP Power in These states

या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजप सत्तेपासून दूर आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख, मणिपूर, मिझोराम आणि सिक्कीममध्येही भाजपला सत्ता मिळवता आलेली नाही. यातील काही राज्ये राजकीयदृष्ट्या लहान आहेत. भाजप दक्षिण भारतात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी द्रमुक, काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांची ताकद जास्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या राज्यांवर नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विजयानंतर कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना म्हटले की, ‘आजच्या विजयाने भाजप कार्यकर्त्यांना केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी आणि पश्चिम बंगाल ओरिसात ही नव्या ऊर्जेने भारावून टाकलं आहे. गंगाही इथूनच जाते आणि बंगालला जाते. बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. मी बंगालच्या नागरिकांनाही सांगतो आता भाजप तुमच्या सोबत मिळून पश्चिम बंगालमधूनही जंगलराज उखडून फेकेल.’ याचाच अर्थ नरेंद्र मोदी यांचे पुढील लक्ष्य हे या राज्यांमध्ये सत्ता मिळवणे हे आहे.