‘राजकीय महत्त्वकांक्षेसाठी इतिहास विकृत…’, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाने कंगनाला सुनावलं

अभिनेत्री कंगना रणौतला आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांची सुनावलं आहे. आपल्या राजकीय महत्त्वकांक्षासाठी इतिहासाला विकृत करु नये, अशा शब्दांत चंद्र कुमार बोस यांनी कंगनाला सुनावलं आहे.

राजकीय महत्त्वकांक्षेसाठी इतिहास विकृत..., नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाने कंगनाला सुनावलं
कंगना रणौत आणि चंद्र कुमार बोस
Chetan Patil | Updated on: Apr 07, 2024 | 8:40 PM

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी भाजपच्या हिमाचलच्या मंडी लोकसभेची उमेदवार कंगना रणौतला तिखट शब्दांत उत्तर दिलं आहे. कंगना रणौतने भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. पंडीत जवाहरलाल हे देशाचे पहिली पंतप्रधान नाहीत तर सुभाषचंद्र बोस हे पहिले भारताचे पंतप्रधान होते, असा दावा कंगनाने केला होता. तिच्या या दाव्यावरुन चंद्र कुमार बोस यांनी प्रत्युत्तर देत तिच्यावर निशाणा साधला आहे. चंद्र कुमार बोस यांनी ट्विटरवर (X) आपली भूमिका मांडली आहे. आपल्या राजकीय महत्त्वकांक्षासाठी इतिहासाला विकृत करु नये, अशा शब्दांत चंद्र कुमार बोस यांनी कंगनाला सुनावलं आहे.

“नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक राजकीय विचारक, सैनिक, राजनेता, दूरदर्शी होते. ते एकमेव असे नेता होते जे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व समाजाला एकजुटीने एकत्र आणू शकत होते. नेताजींच्या प्रती खरा सन्मान हा त्यांच्या विचारसरणीचं पालन करणं आणि त्यानुसार आचरणात आणणं आहे”, असं चंद्र कुमार बोस म्हणाले आहेत.

चंद्र कुमार बोस आधी भाजपात होते. पण त्यांनी भाजप पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. चंद्र कुमार गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भाजपातून बाहेर पडले होते. आपले विचार भाजप पक्षासोबत जुळत नसल्याचा दावा करत त्यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा मार्ग निवडला होता.

कंगना नेमकं काय म्हणाली होती?

पंडित जवाहरलाल नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताचे पहिले पंतप्रधान होते, असं कंगनाने म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावर ट्विटवर टीका होऊ लागली तेव्हा तिने एका लेखाचा स्क्रिनशॉट शेअर करत इतिहास वाचण्याचा सल्ला टीका करणाऱ्यांना दिला. संबंधित लेखमध्ये म्हटलं होतं की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकार बनवत स्वत:ला देशाचा पहिला पंतप्रधान घोषित केलं होतं. “मी तुमच्या आयक्यूपेक्षा जास्त बोलत असेल तर तुम्हाला वाटतं मला माहिती नाही. पण ही थट्टा तुमची आहे आणि हे खूप वाईट आहे”, असं कंगना म्हणाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us